गेले काही दिवस सातत्याने रणबीर कपूर आणि कतरिना कैफ वेगळे झाल्याच्या गोष्टीवरून कुजबुज सुरू आहे. या दोघांनी नेहमीप्रमाणे याही विषयावर चुप्पी साधली आहे. ‘तमाशा’ चित्रपटाच्या निमित्ताने रणबीर आणि दीपिका पदुकोण एकत्र आल्यापासून या वादळाला सुरुवात झाल्याची चर्चा होती. मात्र या कतरिना आणि रणबीरमधील भांडणाला दीपिका नव्हे तर आणखीनच तिसरी व्यक्ती कारणीभूत असल्याची गोष्ट उघड झाली आहे.
रणबीर कपूर आणि कतरिना कैफ वेगळे झाले आहेत, यावर अजूनही इंडस्ट्रीतील लोक विश्वास ठेवायला तयार नाहीत. नवीन वर्षांच्या पार्टीच्या निमित्ताने ते दोघेही एकत्र प्रसिद्धीमाध्यमांसमोर आले होते. मात्र त्यानंतर लगेचच काही दिवसांत रणबीर कतरिनाच्या घरातून बाहेर पडला. आईवडिलांबरोबर नवीन घरात राहायला लागल्यापासून त्यांच्या वेगळे होण्याच्या वृत्ताला दुजोरा मिळाला आहे. नेहमीप्रमाणे या दोघांच्या वेगळे होण्याला दीपिका पदुकोणच कारणीभूत असल्याचा अंदाज व्यक्त झाला होता. प्रत्यक्षात दीपिका या सगळ्या गोष्टींपासून दूर आहे. आणि जिच्याबद्दल विचारही होऊ शकला नसता ती अलिया भट या दोघांमधील वादाचे मूळ कारण ठरली आहे.
रणबीर कपूर आणि अलिया भट यांच्यातील वाढती जवळीक कतरिनाला मान्य नसल्याने त्यांच्यात वारंवार भांडणे होत होती.
आपल्याला अलियाचे काम आवडत असल्याचे आणि तिच्याबरोबर काम करण्याची इच्छा असल्याचे रणबीरने जाहीर केले होते. ‘हायवे’ प्रदर्शित झाल्यानंतर करण जोहरच्या घरी झालेल्या वाढदिवसाच्या पार्टीत रणबीर आणि अलियाची भेटही झाली. त्या वेळीही कतरिनाकडे दुर्लक्ष करून रणबीर अलियाबरोबर गप्पा मारण्यात रमला होता.
अलियासाठी रणबीरचे कतरिनाकडे वारंवार दुर्लक्ष होऊ लागल्यामुळे त्यांच्यातील तणाव वाढत चालला होता. त्यातच इम्तियाजने रणबीर आणि अलियाला घेऊन एक रोमॅँटिक चित्रपट करण्याचा निर्णय घेतला. हाही निर्णय कतरिनाला मान्य नव्हता. पण तिला तोही निर्णय स्वीकारावा लागला. अलियावरून या दोघांमध्येही वाद इतके विकोपाला गेले की त्या दोघांनीही एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.