कंगना रणौत हिनं पुन्हा एकदा आपला मोर्चा अभिनेत्री आलिया भट्टकडे वळवला आहे. ‘मणिकर्णिका’चं यश साजरं करण्यासाठी ठेवण्यात आलेल्या पार्टीत कंगनानं आलिया भट्ट आणि रणबीर कपूरला बेजबाबदार म्हटलं होतं. कंगनाच्या या टीकेला आलियानं पुन्हा एकदा तितक्याच संयमानं उत्तर दिलं आहे.

‘कंगनासारखं बेधडक बोलणं मला जमत नाही. तिच्या जागी ती योग्य असल्याचं मला वाटते. कधी कधी आम्ही कलाकार माघार घेतो. उगाच का बोलावं असं आम्हाला वाटतं. मला मतं आहेत मात्र ती मी माझ्यापुरताच ठेवते. पण कंगना उत्तमपणे आपलं मत मांडते.’ असं उत्तर आलियानं दिलं आहे.

आलिया रणबीर सारखे कलाकार राजकारणावर बोलणं टाळतात असा आरोप कंगनानं केलं होता. आलियानं कंगनानं केलेल्या आरोपावर संयमानं उत्तर दिलं आहे. याआधीही कंगनानं आलियावर टीकेची तोफ डागली होती. आलियासारख्या कलाकारांना स्वत:ची मत नाहीत ती करण जोहरच्या हातची कठपुतळी आहे असं कंगना म्हणाली. कंगानाच्या या आरोपांवर आलियानं जाहीरपणे बोलणं टाळलं होतं तिला मी स्वत: भेटून यावर उत्तर देईन असं ती म्हणाली होती.