ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण ही मालिका प्रेक्षकांच्या पुरेपूर पसंतीस उतरली आहे. या मालिकेमधल्या नचिकेत, सई आणि अप्पा केतकर या तीन व्यक्तिरेखांना प्रेक्षकांनी त्यांच्या मनात कायमची जागाही दिली. सई आणि नचिकेत यांच्या प्रेमामधली लपवाछपवी पहाताना प्रेक्षकांनाही मजा येते आहे त्यात अप्पांची लुडबूड या मजेमध्ये भरच पाडतेय.

सई, नचिकेत आणि नचिकेतची थेट ऑस्ट्रेलियावरुन आलेली मैत्रीण कॅडी यांचा प्रेमाचा त्रिकोण बनणार नाही ना असे विचार करता करता प्रेक्षकांची दमछाक होतेय आणि या सगळ्याचा परिणाम म्हणजे मालिकेला मिळणारा चाहत्यांचा भरघोस प्रतिसाद. पाहता पाहता या मालिकेने ३०० भागांचा यशस्वी टप्पा गाठला आहे.

नुकतंच या मालिकेच्या ३००व्या भागाचं प्रक्षेपण झालं आणि हा आनंद कलाकारांनी सेटवर साजरा केला. या मालिकेतील अप्पा म्हणजेच अभिनेता सुनील गोडबोले यांनी आनंद व्यक्त केला आहे. “प्रेक्षकांचं अविरत प्रेम आणि पाठिंब्यामुळे ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण या मालिकेने ३०० मालिकांचा यशस्वी टप्पा गाठला. प्रेक्षकांनी आजवर या मालिकेला जो प्रतिसाद दिला असाच पुढेही ते राहतील याची मला खात्री आहे” असे त्यांनी म्हटले आहे.