प्रेक्षकांचं निस्सीम प्रेम आणि पाठिंब्यामुळे झी युवा वाहिनीवरील ‘ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण’ या लोकप्रिय मालिकेने ४०० भागांचा टप्पा गाठला. मराठी संस्कृती आणि परंपरा अगदी मनापासून जपणारे अप्पा केतकर आणि ऑस्ट्रेलियामधून आलेला नचिकेत यांच्यातील नोकझोक प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस पडली. संपूर्ण मालिकेत प्रेक्षकांनी अप्पांना पारंपरिक वेशात पाहिले आहे. पण आता अप्पा चक्क मॉडर्न झाले आहेत. लवकरच प्रेक्षकांना ते मॉडर्न अवतारात दिसणार आहेत. टीशर्ट आणि शॉर्ट्स मधला अप्पांचा हा अवतार पाहून केतकर कुटुंबीयसुद्धा थक्क झालेत. पण अप्पांनी वेस्टर्न कपडे घालण्यामागे कारण काय? हा बदल कशासाठी? असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडणार आहेत.

मालिकेत प्रेक्षकांनी तर पाहिलंच आहे कि, नचिकेत आणि सईच नातं अप्पांनी तर कधीच मान्य केलं नाहीच पण नचिकेतच्या आईला देखील ते मान्य नाही आहे. नचिकेत आणि सईने खूप प्रयत्न केल्या नंतर आता नचिकेतने सर्वांना २४ तासांची मुदत दिली आहे आणि त्यात जर अप्पा आणि इराने त्यांचं नातं मान्य नाही केलं तर ते कोर्ट मॅरेज करतील अशी चेतावणी दिली आहे. त्यांना अडवण्यासाठी आता अप्पा आणि इराने हातमिळवणी केली.

नचिकेतच नातं त्यांना मान्य आहे असं खोटं अप्पा आणि इरा सगळ्यांसमोर बोलतात जेणेकरून ते नचिकेत आणि सईला कोर्ट मॅरेज करण्यापासून थांबवतील. आपल्याला सई आणि नचिकेतचं नातं मान्य आहे याची खात्री पटवून देण्यासाठी इरा पारंपरिक तर अप्पा मॉडर्न वेशात केतकर कुटुंबीयांसमोर सज्ज होतात. ज्या पाश्चात्य संस्कृतीला अप्पांचा विरोध होता आता ती त्यांनी स्वीकारली आहे हे दाखवून देण्यासाठी अप्पा हे वेस्टर्न कपडे परिधान करतात. मॉडर्न अवतारात अप्पांनी सगळ्यांना आश्चर्याचा धक्का तर दिलाच पण सई आणि नचिकेतचे लग्न मोडण्यात ते यशस्वी होतील का? हे प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळेल.