छोट्याशा रोपटापासून ते मोठं झाड होईपर्यंत, ४३ वर्षे ज्या गुलमोहराची देखरेख केली, ते झाड पावसात उन्मळून पडलं. त्या झाडाशी निगडीत अनेक आठवणी अमिताभ बच्चन यांनी नुकत्याच लिहिलेल्या ब्लॉगमध्ये सांगितल्या आहेत. गुलमोहराचं ते झाड त्यांच्या सुखदु:खात कसं सहभागी झालं होतं, जिथे अभिषेक-ऐश्वर्याचं लग्न झालं, ज्या झाडाजवळ अनेक सण कुटुंबीयांनी मिळून साजरे केले, अशा सर्व आठवणी त्यांनी या ब्लॉगमध्ये शब्दरुपात मांडल्या.

त्यांनी लिहिलं, ‘१९७६ मध्ये ज्यादिवशी आम्ही आमच्या पहिल्या घरात आलो होतो, तेव्हा हे छोटंसं रोपटं लावलं होतं. अवघ्या काही इंचांचं ते रोपटं होतं. या घराचं नाव प्रतीक्षा असं ठेवलं होतं. वडिलांनीच लिहिलेल्या एका कवितेतील ओळींमधून हे नाव ठेवलं होतं. स्वागत सबके लिए यहाँ पर, नहीं किसी के लिए प्रतीक्षा…’

गुलमोहर झाडाच्या आठवणी

‘याच झाडाच्या अवतीभवती खेळत मुलं लहानाची मोठी झाली. त्यांचे वाढदिवस, सणासुदीचे दिवस याच गुलमोहराच्या नारंगी फुलांसारखे होते. अभिषेक-ऐश्वर्याचं लग्नसुद्धा याच झाडाजवळ झालं होतं. जेव्हा आई आणि वडिलांचं निधन झालं, तेव्हा प्रार्थनासभेसाठी आलेले अनेक लोक या झाडाच्या सावलीखाली उभे होते. होलिकादहन याच झाडाजवळ व्हायचं आणि दिवाळीत लख्ख प्रकाशात त्याच्या फांद्या चमकायच्या. सत्यनारायणाची पूजा, शांती-समृद्धीसाठी केलेले होमहवन त्याच्या अवतीभवती व्हायचे.’

कोणालाच त्रास न देता चुपचाप उन्मळून पडलं

‘आणि आज ते सर्व दु:खांपासून दूर आहे. कोणालाच त्रास न देता चुपचाप उन्मळून पडलं’, अशा शब्दांत बिग बींनी भावना व्यक्त केल्या. ब्लॉगमध्ये गुलमोहराच्या झाडासाठी कविता लिहित त्यांनी झाडाचं महत्त्व सांगितलं.