गेल्या वर्षाअखेर क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा विवाहबंधनात अडकले. तेव्हापासून खऱ्या अर्थाने कायमचे ‘विरुष्का’ झालेली ही जोडी गेल्या वर्षभरामध्ये सतत काही ना काही कारणामुळे चर्चेत राहिली आहे. विशेष म्हणजे या जोडीने नुकताच त्यांचा पहिला करवाचौथ साजरा केला असून विराटने ट्विटरच्या माध्यमातून अनुष्काविषयीचं त्याचं प्रेम पुन्हा एकदा व्यक्त केलं आहे.

प्रत्येक सौभाग्यवती महिलेसाठी करवाचौथचा दिवस खास असून आपल्या पतीसाठी हे व्रत केलं जातं. त्यातच नवविवाहित दाम्पत्यासाठी या दिवसाचं महत्व काही निराळचं असते. बॉलिवूडमध्ये देखील या दिवसाला प्रचंड महत्व असून अनेक सेलिब्रेटी हा दिवस साजरा करण्यासाठी एकत्र जमतात. त्यातच अनुष्कानेदेखील तिचा पहिला करवाचौथ साजरा केला असून विराटने सोशल मीडियाच्या माध्यमातून अनुष्काच माझं सर्वस्व आहे असं म्हणत त्याचं प्रेम व्यक्त केलं आहे.

‘अनुष्का म्हणजे माझं जग, माझं अस्तित्व आहे’, असं म्हणतं विराटने एक फोटो शेअर केला आहे. यात त्याच्यासोबत अनुष्का झळकली आहे. विराट आणि अनुष्कामधील प्रेम साऱ्यांनाच ठाऊक आहे. विराट अनेक वेळा क्रिकेट सामन्याच्यावेळीदेखील अनुष्काला सोबत घेऊन जात असतो.

दरम्यान,  अनुष्कानेदेखील करवाचौथचा एक फोटो शेअर करत ‘विराट केवळ माझा पती नाही तर तो माझ्यासाठी सर्व काही आहे. माझा आनंद, सुख-दु:ख आहे असं म्हणत त्याला तिने चंद्र आणि ताऱ्यांची उपमा दिली आहे’. त्यामुळे सध्या सोशल मीडियामध्ये या दोघांच्या ट्विटची चर्चा होत असून पुन्हा एकदा या जोडीमधील प्रेम दिसून आलं आहे.