माहितीचा स्त्रोत म्हणून पाहिला जाणारा छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो कौन बनेगा करोडपती १२ सध्या चर्चेत आहे. या शोचे सूत्रसंचालन बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन करत आहेत. शो मध्ये येणारे स्पर्धक आणि अमिताभ बच्चन यांच्यामधील संवाद हे कायम चर्चेचा विषय असतात. बुधवारी कौन बनेगा करोडपतीमध्ये हॉटसीटवर योगेश हल्के हे हॉटसीटवर बसले होते. दरम्यान अमिताभ यांनी त्यांच्या आयुष्यातील एक किस्सा सांगितला आहे.

शोमध्ये योगेश यांनी बिग बींना विचारले की तुम्ही जया मॅडमला लग्नाआधी लव्ह लेटर लिहिले आहे का? त्यावर अमिताभ यांनी उत्तर देत म्हटले की मी जयाला खूप वेळा लव्ह लेटर लिहले आहेत. त्यानंतर अमिताभ यांनी जया यांच्याशी लग्न करण्याच्या निर्णयावर वडिल काय म्हणाले होते हे देखील सांगितले आहे.

“आम्ही ठरवले होते जर पुढचा चित्रपट हिट झाला तर मित्रांसोबत परदेशात फिरायला जायचे. चित्रपट प्रदर्शित झाला आणि चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. आम्ही फिरायला जाण्याचा निर्णय घेतला. मी माझ्यासोबत जयाला घेऊन जाणार होतो. मात्र, जेव्हा मी याबाबत माझे वडील हरिवंश राय बच्चन यांना सांगितले तेव्हा ते काहीच बोलले नाहीत” असे बिग बींनी म्हटले.

त्यानंतर वडिलांनी मला बोलावले आणि म्हणाले, जर तुला या मुलीसोबत फिरायला जायचे असेल तर आधी तुला तिच्याशी लग्न करावे लागेल. मी लग्न केले आणि नंतर आम्ही एकत्र फिरायला गेलो असे बिग बींनी पुढे म्हटले.