छोट्या पडद्यावरील वादग्रस्त शो बिग ‘बिग बॉस १२’ च्या घरातून नेहा पेंडसे बाद झाल्यानंतर आता भजन सम्राट अनुप जलोटा आणि सबा खान यांनाही घराच्या बाहेर पडावं लागलं आहे. मात्र घरातून बाहेर पडलेल्या सबाने एका मुलाखतीमध्ये श्रीसंत ताशेरे ओढले आहेत.

‘बिग बॉस’च्या घरात सारेच स्पर्धक जिंकण्यासाठी आले आहेत आणि  प्रत्येक स्पर्धक हा चांगलाच स्ट्रॉंग आहे. परंतु श्रीसंत हा घरातला धुर्त स्पर्धक असून तो पहिल्या दिवसापासून डर्टी गेम खेळत  आलेला आहे, असा आरोप सबाने श्रीसंतवर केला आहे.

‘बिग बॉसच्या घरात वेगवेगळे टास्क देण्यात येत असतात. मात्र श्रीसंत जिंकण्यासाठी काहीही करायला तयार असतो. त्याच्यासारखं चालाख स्पर्धक मी आतापर्यंत पाहिलेला नाही. बाकी घरातील इतर स्पर्धकही चांगले आहेत. परंतु या साऱ्यांनी माझ्या स्वभावाचा फायदा घेतला आणि मला नॉमिनेट केलं’, असं सबा म्हणाली.

पुढे ती असंही म्हणाली, ‘मी भावनिकदृष्ट्या कमजोर आहे हे घरातल्या साऱ्या स्पर्धकांनी ताडालं होतं. त्यामुळे त्यांनी मला ‘इमोशनल फुल’ करत घरातून सहजरित्या बाहेरचा रस्ता दाखवला. बिग बॉसच्या माध्यमातून मला पहिल्यांदाच एका रिअॅलिटी शो मध्ये सहभागी होता आलं. मात्र हा अनुभवही चांगला होता. सारेच स्पर्धक चांगले आहे. पण बिग बॉस १२ ची विजेती माझी बहीण सोमी जिंकावी अशीच कायम इच्छा असेल’.

दरम्यान, या पर्वामध्ये ‘विचित्र जोडी’ ही संकल्पना असून सबाने बहीण सोमीसोबत  घरात प्रवेश केला होता. आतापर्यत अनुप जलोटा, नेहा पेंडसे यांना घरातून बाहेर पडावं लागलं आहे. परंतु नेहा पेंडसेची घरात पुन्हा एकदा एण्ट्री होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.