भारतीय सिनेसृष्टीत सध्या चरित्रपटांचे वारे वाहात आहेत. येत्या काळात 'पृथ्वीराज', 'मैदान', '83', 'सायना', 'सरदार उधम सिंग' असे अनेक चरित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. या यादीत आता आणखी एका नव्या चित्रपटाची भर पडली आहे. हा चित्रपट अहिल्यादेवी होळकर यांच्या आयुष्यावर आहे. आपल्या राज्यकारभार आणि न्यायदानात निष्णात असलेल्या इतिहासातील महान कर्तृत्ववान तेजपुंज राणी म्हणजेच 'अहिल्यादेवी होळकर'. त्यांचा इतिहासातून नव्या पिढीला प्रेरणा मिळावी यासाठी या चित्रपटाची निर्मिती केली जात आहे. 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी' असं या आगामी चित्रपटाचं नाव आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. "समाजात आदर्श निर्माण केलेल्या व्यक्तींचे चित्रपट प्रदर्शित केल्यामुळे तरुण पिढीला प्रेरणा मिळते. त्यामुळे 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी' चित्रपट महाराष्ट्राबरोबरच देशातील युवा पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल. या चित्रपटामुळे त्यांचे कार्य घराघरांत पोहोचण्यास मदत होईल", असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. कोण होत्या अहिल्यादेवी? अहिल्यादेवी अत्यंत बुद्धिमान, प्रखर विचारवंत आणि स्वाभिमानी राज्यकर्त्या म्हणून ओळखल्या जातात. विविध विषयांवर दररोज त्या विपुल विचार विनिमय करायच्या जनतेच्या समस्या ऐकून त्यांची सोडवणूक करायच्या. त्यांनी प्रजेसाठी अनेक कामे केली. त्यांनी केलेल्या महान कार्यामुळे आजही लोक त्यांचे नाव घेतात. धर्म, संस्कृती परंपरा यांचा त्यांनी कायम सन्मान करून आपले साम्राज्य समृद्ध केले. अनेक किल्ले, विश्रामगृहे, विहीरी आणि रस्ते तयार करण्यासाठी त्यांनी सरकारी पैशांचा हुशारीने वापर केला. लोकांसह सण साजरे केले. केवळ दक्षिण भारतातच नाही तर हिमालयापासून कन्याकुमारी पर्यंत त्यांनी हे कार्य केले आहे. सोमनाथ, काशी, गया, अयोध्या, द्वारका, हरिद्वार, कांची, अवंती, बद्रीनारायण, रामेश्वर, मथुरा आणि जगन्नाथपुरी अश्या अनेक मंदिरांमध्ये त्यांनी दानधर्म केले. या बरोबरच, त्यांनी लोकांसाठी वाराणसीचा गंगा घाट, उज्जैन, नाशिक, विष्णुपाद मंदिर आणि बैजनाथ या मुख्य तीर्थक्षेत्रांच्या आसपास अनेक घाट आणि धर्मशाळा बांधल्या. मुस्लिम आक्रमकांनी मोडलेली मंदिरे पाहून त्याने सोमनाथमध्ये शिव मंदिर बांधले. जगातील अनेक इतिहास प्रेमींना अहिल्यादेवींच्या चरित्राने भुरळ घातली आहे. एका इंग्रज लेखकाने त्यांची तुलना रशियाची राणी कॅटरिना, इंग्लंडची राणी एलिझाबेथ आणि डेन्मार्कची राणी मार्गारेट यांच्याशी केली आहे. जगभरातील विचारवंतांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जीवनावर विपुल संशोधन केले आहे. विविध भाषांमध्ये त्यांच्यावर साहित्य निर्मिती झाली असली तरीही त्यांचा बहुतांश इतिहास अजूनही दुर्लक्षित आहे. हा दुर्लक्षित इतिहास या चित्रपटातून दाखविण्याचा आमचा प्रयत्न असेल असे मत दिग्दर्शक दिलीप भोसले व्यक्त करतात.