‘ताल’, ‘हलचल’, ‘दिल चाहता है’, ‘रेस’, ‘हंगामा’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता म्हणजे अक्षय खन्ना. अक्षय गेल्या काही वर्षांपासून चित्रपटांपासून दूरावला आहे. तो क्वचितच चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येतो. कित्येकांनी तर तो लग्न करुन खासगी आयुष्यावर जास्त लक्ष केंद्रित करण्यासाठी असे करत असल्याचेही तर्क लावले. पण वास्तवात मात्र परिस्थिती फारच वेगळी आहे. सध्याच्या घडीला बी-टाऊनमधील लोकप्रिय अविवाहित अभिनेत्यांच्या यादीतही त्याच्या नावाचा समावेश होतो. या यादितील त्याचे हे नाव शेवटपर्यंत तसेच राहण्याची चिन्ह आहेत कारण, अक्षयने कधीही लग्न न करण्याचा निर्णय घेतला आहे.

बॉलिवूडमध्ये आता पर्यंत अक्षय खान्नाचे नाव कोणत्याही अभिनेत्रीसोबत जोडण्यात आलेले नाही किंवा अक्षय खन्ना कोणत्या अभिनेत्रीसोबत फिरतानाही दिसला नाही. ४० वर्षे उलटून गेली आहेत तरीही अक्षयने लग्न केलेले नाही. त्यामागे कोणती अभिनेत्री आहे का? अक्षयच्या लग्नाला घरातल्यांचा विरोध होता का? असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले होते. खुद्द अक्षयने एका मुलाखतीमध्ये याबाबत खुलासा केला.

एका मुलाखतीमध्ये अक्षयने लग्न का केले नाही याचा खुलासा केला होता. ‘मी कोणाला कमिटमेट देण्यासाठी अद्याप तयार नाही. लग्नानंतर सगळ्याच गोष्टी बदलतात. तुम्हाला एखादी गोष्ट करण्यापूर्वी त्या गोष्टीचा खूप विचार करावा लागतो. तुमचे संपूर्ण आयुष्य बदलून जाते’ असे अक्षय म्हणाला.

‘लग्नानंतर मुले झाली की पुन्हा आणखी एक जवाबदारी वाढते. तुम्हाला त्यांना जास्त महत्व द्यावे लागते. इतर गोष्टींपेक्षा तुम्हाला तुमच्या मुलांसाठी वेळ काढावा लागतो. त्यांची जबाबदारी हे खूप मोठे काम आहे आणि त्यासाठी मी अद्याप तयार नाही. म्हणून मी लग्नाचा विचार केलेला नाही’ असे अक्षय म्हणाला.