गाण्याचा हा मुखडा ऐकताच मागील पिढीतील रसिकांचे मन एकदम कृष्ण धवल अर्थात ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटाच्या काळात जाऊन पोहचले असेलच. इन हवाओं में, इन फ़िज़ाओं में तुझको मेरा प्यार पूकारे बी. आर. चोप्रा निर्मित व दिग्दर्शित 'गुमराह'(१९६३) चित्रपटाची सुरुवातच महेंद्र कपूरच्या ओ... ओ. अशा हाकेने होते. एका निसर्गरम्य स्थळावर सुनील दत्त व माला सिन्हा यांचे हे प्रेम गीत सुरु होते. चित्रपटाच्या पहिल्याच फ्रेममधून या दोघांचे निस्सीम प्रेम व्यक्त झाल्याने हीच कथा पुढे आणखीन काय काय दाखवणार याबाबतची उत्सुकता वाढते. रुक ना पाऊं मैं, खिचती आऊं मैं दिल को जब दिलदार पूकारे आशा भोसले तेवढ्याच सहजतेने या प्रेमाला प्रतिसाद देतात. माला सिन्हाने ही भावना उत्कटतेने रुपेरी पडद्यावर साकारलीय. जोडीला छानसा निसर्ग आहेच. त्यासह हे गाणे आपल्या डोळ्यासमोर येते. तुझसे रंगत, तुझसे मस्ती इन झरनो में, इन फूलों में साहिरची गीतरचना आजूबाजूच्या वातावरणलाही या प्रेमात गुंफते. संगीतकार रविदेखिल साहिरप्रमाणेच तसे बी. आर. चोप्रा यांच्या चित्रपटाचे हुकमी. असा त्या काळात सूर जुळे म्हणूनच तेव्हाची गाणी शब्द रचना व दृश्य सादरीकरण अशा दोन्ही पातळीवर एकदमच डोळ्यासमोर येतात. दिल में तेरे दिल की धड़कन आँख में तेरी आँख का जादु एव्हाना सुनील दत्त व माला सिन्हा यांची वेशभूषा सतत बदलते हे प्रेम गीत आणखीन रंगात आलेले असते. प्रत्येक परिच्छेद नवीन वस्त्रात म्हणजेच ते पुन्हा पुन्हा भेटतात हेच दिग्दर्शकाला सुचित करायचे असते. दूरवरच्या डोंगरावरील बर्फाची चादर या सार्यात आणखीन रोमॅन्टिक भर घालते. लाख बलाए सर पर टूटें अब ये सुहाना साथ ना छूटे एकमेकांवरील प्रेमावर निस्सीम विश्वास व्यक्त करण्यात ते दोघेही विलक्षण रमलेत/ रंगलेत. एव्हाना हे दोघे पुन्हा नव्याने भेटलेत. ते देखील नदीपात्रातील एका शिडाच्या होडीत. एकमेकांना ते विश्वास देत गातानाच मध्येच त्या नदीतील बदके दिसतात. त्यामुळे गाणे अधिकच खुलते. मूड के तकना ठिक नही है अब चाहे संसार पूकारे काही झाले तरी या प्रेमातून माघार घ्यायची नाही असा ठामपणा ते व्यक्त करतात. त्या काळातील गाणी किमान चार कडव्यांची असत. पण ती गाण्याचा अर्थ व मूड कोठेच सोडत नसत. येथे तर गाता गाता महेंद्र कपूर व आशा भोसले एकमेकांना ओ. अशी दूरवरून हाक मारत सादही देतात म्हणून हे प्रेम गीत आणखीन बहारदार बनते. आजा आजा रे, तुझको मेरा प्यार पूकारे गाणे त्याच चालीत/ लयीत शेवटाकडे जाते. एक प्रसन्न गाणे पाहिल्याचे समाधान हा अनुभव देतो. तेच तर महत्त्वाचे असते. दिलीप ठाकूर