दिलीप ठाकूर गाण्याचा मुखडा वाचूनच तुम्ही त्याच गंभीरतेने म्हणाल, ‘कोई सहारा ना रहा’ किशोरकुमार जेवढा पार्श्वगायनात यॉडलिंगसाठी प्रसिद्ध आहे , तेवढाच तो धीरगंभीर गाण्यातही खूपच जवळचा वाटतो. त्यात हे गाणे आवर्जून ऐकावेसे वाटणारे आहे. पण एवढ्यावरच 'झुमरु' (१९६१) मधील या गाण्याचे वैशिष्ट्य संपत नाही. तर या गाण्याचा पार्श्वगायक व संगीतकार तो आहेच, पण तोच या चित्रपटाचा नायक असल्याने त्याच्यावरच हे गाणे आहे. आणि त्यातच अतिशय भावुक, व्यथित, दुःखी अशा मधुबालाचेही दर्शन त्यात घडते. कोई हमदम ना रहा, कोई सहारा ना रहा हम किसी के ना रहें, कोई हमारा ना रहा मजरूह सुल्तानपुरी यांचे हे कमालीचे दर्दभरे गाणे नायक आणि गायक अशा किशोरकुमारची वेगळीच ओळख करून देते. खांद्यावर कोट टाकून उदास मनःस्थितीत किशोरकुमार इकडे तिकडे फिरतोय आणि घरात मधुबाला व्यथित भावनेने वावरतेय. शाम तनहाई की है आएगी मंज़िल कैसे जो मुझे राह दिखाए, वही तारा ना रहा गाणे याच उदास मनःस्थितीत पुढे सरकते तरी या दुःखातही गाण्याचा वेगळाच गोडवा आहे. म्हणजेच श्रोत्यांना उदास वातावरणातून हे गाणे बाहेर काढेल अशीच ताकद त्यात आहे. पडद्यावरील या गाण्याच्या सादरीकरणात किशोरकुमार आपल्या वेगळ्याच मनःस्थितीत गात चाललाय तर मधुबाला आता पियानोवर बसलीय पण तिचा सूरच हरवलाय. ऐ नज़ारों ना हँसो मिल ना सकूँगा तुमसे वो मेरे हो न सके मैं भी तुम्हारा ना रहा आता आपले असे कोणीच राहिलेले नाहीत. एक प्रकारचे एकटेपण आलेय ही भावना या गाण्यातून व्यक्त होता होताच कळत नकळतपणे काही तत्वज्ञान देखील सांगण्याचा प्रयत्न झालाय. म्हणूनच तर हे गाणे जास्तच अस्वस्थ करते. किशोरकुमारने तो मूड छानच पकडलाय. अभिनेता म्हणून तो खूपच गंभीर आहे हे त्यानेच निर्माण केलेल्या चित्रपटातून प्रामुख्याने दिसलयं. क्या बताऊँ मैं कहाँ यूँ ही चला जाता हूँ जो मुझे फिरसे बुला ले वो इशारा ना रहा नायक व नायिका एकमेकांपासून दूरावलेत पण त्यांचे एकमेकांवरील प्रेम मात्र खरं आहे. याचा खूप छान प्रत्यय या गाण्यात येतोय. किशोरकुमारच्या गंभीर गाण्यांच्या चाहच्यांचे हे एक खूपच आवडते असे उत्कट गाणे आहे. दुःखी मन मेरे सुन मेरा कहना (फंटूश), तेरी दुनिया से होके मजबूर चला (पवित्र पापी) अशाच गाण्यांची कलात्मक उंची या गाण्याने देखिल साध्य केलीय.