करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी देशात लॉकडाउनच्या कालावधीत वाढ करण्यात आली आहे. सोमवारपासून (१८ मे) या लॉकडाउनचा चौथा टप्पा सुरु होईल. मात्र करोनाग्रस्तांच्या संख्या कमी झाल्याचं दिसून येत नाही. करोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचंच दिसून येत आहे. त्यामुळे प्रसिद्ध लेखक चेतन भगतने सरकारवर ताशेरे ओढले आहेत. ''लॉकडाउन हा श्रीमंतांचा खेळ आहे. श्रीमंत व्यक्ती जर आजारी पडला तो सुट्टी घेऊन महिनाभर घरी बसू शकतो. मात्र गरीबांकडे हा पर्याय नाहीये. तसंच श्रीमंत देश बराच काळ लॉकडाउन घोषित करु शकतात. मात्र गरीब देशाकडे तो पर्याय नाही'',असं ट्विट चेतन भगतने केलं आहे. लॉक्डाउन अमीरों का खेल है। अमीर आदमी बीमार हो तो छुट्टी ले कर महीना घर बैठ सकता है। गरीब के पास वो विकल्प नहीं है। ठीक उसी तरह अमीर देश लम्बा लाक्डाउन कर सकते हैं। गरीब देश के पास वो विकल्प नहीं है। — Chetan Bhagat (@chetan_bhagat) May 16, 2020 दरम्यान, चेतन भगतच्या या ट्विटची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. चेतन भगत बऱ्याच वेळा समाजात घडणाऱ्या घटनांवर व्यक्त होत असतो. सध्या लॉकडाउनचा तिसरा टप्पा सुरु असून उद्यापासून (१८ मे) लॉकडाउनचा चौथा टप्पा सुरु होणार आहे. लॉकडाउन ४.० मध्ये निर्बंध शिथील करण्याबरोबरच आर्थिक घडामोडींना जास्तीत जास्त चालना देण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. तसंच उत्पादन कारखाने सुरु करण्याबरोबरच देशांतर्गत मर्यादित मार्गावर हवाई सेवा सुरु होऊ शकते, असं म्हटलं जात आहे. मात्र त्याविषयी कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही.