रेश्मा राईकवार

डेव्हिड धवन आणि गोविंदा हे नव्वदच्या दशकात विनोदाचं एक अजब लोकप्रिय समीकरण होतं. गोविंदा शैलीतील नृत्य आणि विनोदी अभिनय हा काही सगळ्यांना रुचणारा विषय नाही, तरीही या जोडीचे काही ‘नं. १’ चित्रपट लोकप्रिय झाले. ‘कु ली नं. १’ हा त्याच ठोकळेबाज चित्रपटांमधील एक. मूळ चित्रपटही उथळच होता, त्यामुळे नव्याने २५ वर्षांनी या चित्रपटाचा रिमेक आणताना तेच कथानक त्याच सरधोपट पद्धतीने आणण्याचा खटाटोप अधिकच उथळ आहे. निदान मूळ चित्रपटात गोविंदाची स्वत:ची अशी काही शैली तरी होती, आत्ताच्या रिमेकमध्ये ना गोविंदाचा उसना अवतार घेता येत, ना स्वत:चे काही देता येत अशी वरुण धवनची अवस्था झाली आहे.

रोझेरिओ नामक गृहस्थाच्या दोन कन्या आहेत. पैकी एका कन्येचा विवाह जमवण्यासाठी पंडित जयकिशन रोझेरिओच्या घरी येतो, मात्र आपल्या मुलीचा विवाह भाजी घेण्यासाठीही चार्टरने जाणाऱ्या गर्भश्रीमंत तरुणाशीच करायचा आहे, असा हट्ट घेऊन बसलेला रोझेरिओ त्याचा अपमान करतो. या अपमानाचा बदला घेण्यासाठी स्टेशनवर भेटलेल्या राजू कु लीला कुं वर राजप्रताप सिंह बनवत पंडित रोझेरिओच्या कन्येचा विवाह त्याच्याशी करून देतो. आणि मग कधी कुं वर राज तर कधी कु ली नं. १ राजूचा उलटासुलटा प्रवास सुरू होतो. अनेक गोंधळानंतर साठा उत्तराची कहाणी सुफळ संपूर्ण होणारच याची कल्पना असल्याने के वळ वरुण धवन आणि सारा अली खान यांचे चेहरे पाहत चित्रपट पूर्ण करणे एवढेच हातात उरते.

आजच्या मोबाइल-लॅपटॉपने अद्ययावत तंत्रज्ञानाच्या युगात तर्क खुंटीला टांगून १९९५ सालचे कथानक त्याच पद्धतीने दाखवण्यात काय हशील आहे? हातात मोबाइल असलेले  नायक-नायिका आपल्या जोडीदाराविषयी माहिती काढू शकत नाहीत. गोव्यात पंचतारांकित रिसॉर्टचे व्यवस्थापन सांभाळणाऱ्या हुशार (?) तरुणीला आपल्याला कोणीतरी फसवू पाहतं आहे, याचा शोधही लागत नाही. २५ वर्षांनीही जुळ्या भावाच्या कथानकावर त्याच आंधळेपणाने विश्वास ठेवणारे लोक असू शकतात? किमान काळाचा विचार करून संदर्भ बदलण्याचा प्रयत्न लेखकाकडून के ला जात नाही, हे अनाकलनीय आहे. रुमी जाफरी यांनी या चित्रपटाचे पटकथा लेखन के ले असून फरहाद सामजी यांनी संवाद लिहिले आहेत. दोघेही विनोदी चित्रपटांसाठी ओळखले जातात आणि या क्षेत्रातील अनुभवी आहेत. कथानकातच नाही तर ते पडद्यावर तरी कसे येणार?

मूळ चित्रपटात वर म्हटल्याप्रमाणे गोविंदा, करिश्मा कपूर, कादर खान, सदाशिव अमरापूरकर अशी एक से बढकर एक मंडळी होती. कादर खान तर त्याच त्याच पद्धतीच्या भूमिकांमध्येही आपल्या वेगळ्या अभिनय शैलीमुळे भाव खाऊन जायचे. इथे त्यांची जागा परेश रावल यांनी घेतली आहे. त्यांनी आपल्या वाटय़ाला आलेली भूमिका निभावली आहे, एवढेच म्हणता येईल. सारा अली खानला चित्रपटात नाचण्याशिवाय करण्यासारखे काहीच नाही. आणि गोविंदा-करिश्मा जोडीप्रमाणे वरुण-सारा नृत्यातही आपली छाप पाडू शकलेले नाहीत. दोन तासांच्या या चित्रपटात त्यातल्या त्यात लक्षात राहणारे चेहरे म्हणून जावेद जाफरी, शिखा तलसानिया आणि साहिल वेद या तिघांचेच नाव घ्यावे लागेल.

त्यातही जावेद जाफरी, साहिल वेद सहज अभिनयाच्या जोरावर आपल्या वाटय़ाला आलेल्या व्यक्तिरेखा चोख पार पाडतात. शिखाच्या बाबतीत ती उत्तम अभिनेत्री आहे, आणि त्यामुळेच तिचे असणे प्रसन्न वाटले तरी ती या चित्रपटात काय करते? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. किं बहुना, ती स्वत:च या चित्रपटात अनेक ठिकाणी अवघडलेली वाटते. चित्रपटात जुनीच गाणी नव्याने गायलेली आहेत, जी अजिबात गुणगुणावीशी वाटणारी नाहीत. त्यामुळे एकू णच या चित्रपटाने काय साधले? हा प्रश्न सतावत राहतो.

कु ली नं. १

दिग्दर्शन – डेव्हिड धवन

कलाकार – वरुण धवन, सारा अली खान, साहिल वेद, जावेद जाफरी, परेश रावल, शिखा तलसानिया, भारती आचरेकर, अनिल धवन, राजपाल यादव.