आमिर खान, अक्षय खन्ना आणि सैफ अली खान यांची मुख्य भूमिका असलेला ‘दिल चाहता है’ हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करुन आहे. या चित्रपटातून मैत्रीची एक वेगळीच परिभाषा प्रेक्षकांसमोर सादर करण्यात आली. मैत्री, प्रेम, नाती या सर्व गोष्टींवर प्रकाशझोत टाकणाऱ्या या चित्रपटाला १८ वर्ष पूर्ण झाली आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये कमालीची क्रेझ असून या चित्रपटाचा सिक्वल काढण्याची मागणी अनेक चाहत्यांनी केली आहे. चाहत्यांच्या या मागणीवर चित्रपटाचा दिग्दर्शक फरहान अख्तर याने उत्तर दिलं आहे.

‘दिल चाहता है’ची क्रेझ चाहत्यांमध्ये प्रचंड असून सध्या सोशल मीडियावर #WeWantDCH2 हा हॅशटॅग व्हायरल होत आहे. मात्र सध्या तरी या चित्रपटाचा सिक्वल येणार नसल्याचं चित्रपट दिग्दर्शक फरहान अख्तर याने सांगितलं. एका मुलाखतीमध्ये त्याने या चित्रपटाविषयी अनेक गोष्टींवर चर्चा केली.

“कोणत्याही चित्रपटाचा सिक्वल करायचा असेल तर तो चित्रपट करण्यासाठी एक मूड हवा असतो. सोबतच उत्साह आणि पुरेसा वेळ असणं गरजेचं आहे. आणि हे तेव्हाच शक्य होतं जेव्हा तुम्ही अशा कुठल्या तरी प्रोजेक्टबद्दल सतत विचार करत असता. मात्र आम्ही सध्या ‘दिल चाहता है’च्या सिक्वलचा विचार करत नाहीये”, असं फरहानने सांगितलं.

दरम्यान, चित्रपटाला १८ वर्ष पूर्ण झाल्यामुळे फरहानने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्याने चित्रपटामध्ये सहभाग असलेल्या प्रत्येकाचे आभार मानले आहेत.