वादग्रस्त आणि तितकाच लोकप्रिय ठरलेल्या ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोचं बारावं पर्व अखेर संपलं. माजी क्रिकेटपटू श्रीसंत आणि टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्कर यांच्यापैकी एखादा विजेता ठरणार होता. प्रेक्षकांना श्रीसंतच्या बाजूने निकाल येईल असं वाटत असतानाच अचानक दीपिका कक्कर शोची विजेची घोषित करण्यात आली. ‘बिग बॉस’च्या या निर्णयावर सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केला. या निर्णयावर श्रीसंतची मॅनेजर रोनिता वर्मा हिने आक्षेप घेत सोशल मीडियावर राग व्यक्त केला. ‘खोट्या शोची खोटी विजेती’ अशा शब्दांत तिने संताप व्यक्त केला.

‘कृपा करून पुढच्या वेळी शोमध्ये सत्संग करणाऱ्या लोकांनाच बोलवा. दीपिका तू हा शो जिंकण्याच्या लायकीची नव्हती,’ असं ट्विट करत रोनिताने थेट दीपिकावर निशाणा साधला. श्रीसंतच्या मॅनेजरसोबतच नेटकऱ्यांनीसुद्धा बिग बॉसच्या विजेतीवर आक्षेप घेतल्याचं पाहायला मिळालं. कारण दीपिका विजेती घोषित झाल्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. बिग बॉसने पक्षपात केला असाही आरोप नेटकऱ्यांनी केला आहे.

वाचा : #MeToo मोहिमेवर राणीनं मांडलेलं मत दीपिका, अनुष्कालाही खटकलं

दीपिका आणि श्रीसंतसह दीपक ठाकूर, करणवीर बोहरा, रोमिल चौधरी ‘बिग बॉस १२’च्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचले होते. दीपक ठाकपूरने २० लाख रुपये घेऊन शोमधून बाहेर पडणं पसंत केलं. त्यानंतर करणवीर आणि रोमिल हे दोघे बाद झाले. अखेरच्या क्षणी दीपिका आणि श्रीसंत यांच्यात विजेतेपदासाठी चुरस होती. दीपिकाने ‘बिग बॉस’ची ट्रॉफी आणि ३० लाख रुपये जिंकले.