एस. एस. राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली : द बिगनिंग’ आणि ‘बाहुबली : द कन्क्लुजन’ या दोन्ही चित्रपटांनी भारतीय चित्रपट सृष्टीमध्ये एक वेगळीच छाप उमटवली आहे. राजामौली यांनी अनेक वेळा मुलाखतींमध्ये महाभारतावर चित्रपट काढण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांची ही इच्छा पाहता आता चाहत्यांनी राजामौली यांच्याकडे एक वेगळी मागणी केली आहे. त्यांनी रामायणावर चित्रपट काढावा अशी मागणी चाहत्यांनी केली आहे. चाहत्यांच्या या मागणीनंतर सोशल मीडियावर #RajamouliMakeRamayan ट्रेंड होत आहे.

सोशल मीडियावर राजमौली यांनी रामायणावर चित्रपट काढावा अशी मागणी उत्तर रामायण म्हणजेच लव कूश ही मालिका संपल्यानंतर केली जात आहे. एका चाहत्याने राजामौली हे रामायणावर चित्रपटत काढून त्याला योग्य न्याय देतील असे म्हटले आहे.

‘रामायण’ ही मालिका सुरु होताच प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून धरली होती. ही मालिका पुन्हा दाखवल्यामुळे मालिकेतील कलाकारदेखील पुन्हा एकदा चर्चेत आहेत. तसेच काही दिवसांपूर्वी मालिकेने विश्वविक्रम केल्याचे समोर आले. या मालिकेने एका दिवसात ७.७ कोटी व्ह्युज मिळाले आहेत. मालिकेने व्ह्यूच्या बाबतीत गेम ऑफ थ्रोन्सचा देखील विक्रम मोडला आहे.

प्रसारभारतीच्या ट्विटर पेजवर एक पोस्ट शेअर केली असून त्यांनी रामायण या मालिकेला १ दिवसात ७.७ कोटी व्ह्युज मिळाल्याचे म्हटले आहे. त्यासोबतच हा विश्वविक्रम असल्याचेही त्यांनी स्पष्ट केल आहे. १६ एप्रिल रोजी या मालिकेला ७.७ कोटी व्ह्युज मिळाले असे त्यांनी म्हटले आहे.