बॉलिवूडमधील आदर्श जोड्यांमधील एक जोडी म्हणजे अभिनेता धर्मेंद्र आणि हेमा मालिनी. गेल्या ४० वर्षांपासून एकमेकांची साथ देणारं हे कपल आजही प्रेक्षकांचं तितकंच लाडकं आणि आवडतं आहे. त्यामुळे कायमच याची चाहत्यांमध्ये चर्चा रंगत असते. मात्र, लग्नाला इतकी वर्ष होऊनदेखील एकमेकांना वेळ देता आला नाही, असं हेमा मालिनी म्हणाल्या आहेत. एका मुलाखतीत त्या बोलत होत्या. त्यामुळे सध्या त्यांच्या या वक्तव्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. "मला आणि धर्मेंद यांना लग्नानंतर कधीच एकमेकांसाठी वेळ देता आला नाही. याविषयी मी कधी कोणतीही तक्रारदेखील केली नाही. जो वेळ आम्हाला एकमेकांसोबत मिळाला तोच माझ्यासाठी बहुमुल्य होता", असं हेमा मालिनी म्हणाल्या. पुढे त्या म्हणतात, "मी माझ्या आयुष्यात खूश आहे. त्यामुळे त्यात कोणते बदल व्हावे अशी माझी अजिबात इच्छा नाही. तसंच माझ्या आयुष्यात अमूक गोष्ट करायची राहिली, तमूक गोष्ट झाली नाही, या गोष्टींकडे मी कायम दुर्लक्ष करते आणि धर्मेंद्र यांच्याविषयी कोणाकडे तक्रारही करत नाही". दरम्यान, हेमा मालिनी आणि धर्मेंद ही जोडी ७० च्या दशकातील सुपरहिट जोडी म्हणून ओळखली जाते. आजवर त्यांनी अनेक लोकप्रिय आणि गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. यात 'शोले', 'सीता और गीता', 'दिल्लगी' आणि 'ड्रिम गर्ल' अशा काही चित्रपटांचा समावेश आहे.