जवळपास २५ वर्षांपूर्वी १९९४ मध्ये सुष्मिता सेननं ‘मिस युनिव्हर्स’चा किताब जिंकला. त्याच वर्षी ऐश्वर्या रायने ‘मिस वर्ल्ड’चा किताब आपल्या नावे केलं. तेव्हापासून सुष्मिता आणि ऐश्वर्यामध्ये फारसं पटायचं नाही. तेव्हा फॅशन आणि मॉडेलिंग विश्वात सुष्मितापेक्षा ऐश्वर्याचं नाव चर्चेत होतं, पण तरीसुद्धा सुष्मिता ‘मिस युनिव्हर्स’ झाल्यामुळे या दोघांमध्ये जणू शीतयुद्धच होतं. अनेक वर्षांनंतर या भांडणावर सुष्मिताने वक्तव्य केलं आहे.

ऐश्वर्यासोबत कुठलेही मतभेद नसल्याचं स्पष्ट करत सुष्मिता म्हणाली, ‘ऐश्वर्याशी मी नेहमीच प्रेमळपणे वागली आहे. आमच्या दोघांमध्ये वाद असल्याच्या चर्चा खोट्या आहेत.’ तुम्ही दोघी मैत्रिणी आहात का असा प्रश्न विचारला असता ती पुढे म्हणाली, ‘यासाठी आधी आम्हाला एकमेकांसोबत पुरेसा वेळ घालवावा लागेल. पण आमच्यात नक्कीच मैत्रीपूर्ण नातं आहे आणि वाद अजिबात नाही.’

सोशल मीडिया असो किंवा प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखती, मी ऐश्वर्याबद्दल कुठेच कधी राग व्यक्त केला नाही, असं सुष्मिताने सांगितलं. गेल्या २० वर्षांहून अधिक काळापासून रंगलेल्या सुष्मिता-ऐश्वर्या वादाच्या चर्चांना अखेर सुष्मिताने पूर्णविराम दिला आहे. आमच्यात वाद होता, हा लोकांचा गोड गैरसमज असल्याचं तिने स्पष्ट केलं आहे.