‘द कपिल शर्मा शो’चा दुसरा सिझन हळूहळू प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरत आहे. या शोला चांगला टीआरपीसुद्धा मिळत आहे. दुसऱ्या सिझनमध्ये किकू शारदा, सुमोना चक्रवर्ती, चंदन प्रभाकर, रोचेल राव हे जुने साथीदार कपिलची साथ देत आहेत. तर भारती सिंग, कृष्णा अभिषेक या दोन नवीन कलाकारांचीही भर पडली. पण गेल्या काही दिवसांपासून या शोमध्ये कपिलचा बालपणीचा मित्र आणि सहकलाकार चंदन प्रभाकर दिसत नाहीये. त्यामुळे चंदनने हा शो सोडला की काय अशीही चर्चा होऊ लागली आहे.

दुसऱ्या सिझनमध्ये चंदन ‘चंदू चायवाला’ ही भूमिका साकारत आहे. चंदन बऱ्याच दिवसांपासून शोमध्ये दिसत नसल्याने सोशल मीडियावर त्याची चर्चा होऊ लागली. चंदनच्या चाहत्यांनी याविषयी त्याला सोशल मीडियावर विचारलेसुद्धा. तर अनेकांनी कार्यक्रमात परत येण्याची मागणीदेखील केली.

वाचा : सानिया मिर्झाची बहीण मोहम्मद अझरुद्दीनच्या मुलाशी करणार निकाह?

चाहत्यांचे हे मेसेज वाचून चंदनने स्वत: सोशल मीडियावर उत्तर दिले आहे. ‘कपिलच्या शोमध्ये कधी परतणार असा प्रश्न मला गेल्या काही दिवसांपासून अनेकजण विचारत आहेत. तुमच्या या प्रेमासाठी मी तुमचा आभारी आहे. पण सध्याची स्क्रिप्ट माझ्या व्यक्तिरेखेला योग्य नसल्याने, माझ्या व्यक्तिरेखेला त्यात योग्य जागा नसल्याने मी कार्यक्रमात तुम्हाला दिसत नाहीये,’ असं त्याने सांगितलं.