'बॉर्डर' (१९९७) पूर्वी दिग्दर्शक जे. पी. दत्ताची ओळख राजस्थान-उत्तर प्रदेशच्या पार्श्वभूमीवरील थीमपासून संगीतापर्यंत चित्रपट निर्माण करण्याची होती. भाषेतूनही ती खासियत जपली जाई. आग्रा, फतेहपुर येथील मुगलकालिन किल्ले, ग्रामीण परिसर, तेथील 'क्षत्रिय' संस्कृती, 'ठाकूर' अभिमान/ कडवटपणा व राजस्थानचा वाळवंटी भाग यातून त्याला व त्याचे पटकथाकार लेखक पिता ओ. पी. दत्ता याना नवीन चित्रपट सुचतो वा सापडतो असे म्हटले जाई. तुफान घौडदौड, बेछूट गोळीबार, खणखणीत तलवारबाजी, जोरदार संवाद, अवघड गीते या सामुग्रीसह 'मल्टी स्टार कास्ट' या दमदार वैशिष्ट्याने त्याचे चित्रपट मनोरंजक ठरत. ईश्वर बिर्दीचा कॅमेरा, रत्नाकर फडकेचे कला दिग्दर्शन व दीपक विरकुडचे संकलन ही त्याची हुकमी टीम. 'गुलामी' (१९८५) च्या यशाने त्याला हे सूत्र दिले. तर 'यतीम' (१९८८), 'हत्यार' (१९८९) व 'बंटवारा' (१९८९) हे साधारण एकाच वेळेस आले. तेव्हा विभागवार चित्रपट प्रदर्शित होत. त्यामुळेच उत्तर भारतातून मुंबईत 'यतिम' येईपर्यंत १९८९ साल उजाडले व एकाच वर्षी एकाच दिग्दर्शकाचे तीन चित्रपट प्रदर्शित झाले. 'क्षत्रिय' (१९९३) ला आला. एव्हाना जे.पी. दत्ताच्या भव्य चित्रपटाची आपली वेगळीच संस्कृती होती हे चांगलेच लक्षात आले असेल. 'बटवारा' त्याच सर्व वैशिष्ट्यानी ठासून भरलेला. निर्माता सलिम याने आपल्या अफताब पिक्चर्स या बॅनरखालील या चित्रपटाच्या निर्मितीत कसलीच कसर ठेवली नाही. तरी हा चित्रपट रंगला मात्र नाही. अनेकानेक व्यक्तिरेखाना न्याय (की फुटेज) देता देता चित्रपट इतका व असा मोठा झाला की तेव्हा एक दंतकथा पसरली की निर्माता सलिमच आता काटछाट करतोय. जे. पी. दत्ता लोकेशनच्या प्रेमात पडतो की पटकथेच्या अशीही चर्चा रंगे. शम्मी कपूर बडे ठाकूर यापासून केवढे तरी कलाकार. धर्मेंद्र, विनोद खन्ना, डिंपल खन्ना, अमृता सिंह, पूनम धिल्लोन, आशा पारेख, अमरिश पुरी, मोहसीन खान, नीना गुप्ता हे सगळेच प्रमुख भूमिकेत. अन्य छोटे कलाकार वेगळेच. अमिताभ बच्चनचे निवेदन होते. याच चित्रपटाच्या निर्मितीच्या काळात जे.पी. दत्ताने अमिताभला मध्यवर्ती भूमिका देत 'बन्धुआ' या चित्रपटाच्या नटराज स्टुडिओतील मुहूर्ताला हजर राहण्याचा योग आला. हा चित्रपट त्याच्या मुहूर्तालाच बंद पडला. पण अमिताभ आवाजाच्या रुपाने 'बटवारा'मध्ये दिसला. आनंद बक्षींची गीते व लक्ष्मीकांत- प्यारेलाल यांचे संगीत थीमनुसार हा जे. पी. दत्ताचा कटाक्ष म्हणावा. कविता कृष्णमूर्ती, अलका याज्ञिक व अनुराधा पौडवाल यांच्या 'थारे वास्ते रे ढोला.. ' गाण्याचा खास उल्लेख करायला हवाच. जे.पी. दत्ताच्या अशा वेगळ्याच पार्श्वभूमीवरील अॅक्शनपटाचा तेव्हा स्वतंत्र प्रेक्षक वर्ग होता हे विशेषच उल्लेखनीय. दिलीप ठाकूर