“सूर्यास्तानंतर गडाचे दरवाजे बंद झाल्यामुळे, आपले बाळ घरी एकटे असेल…भूकेले असेल या विचाराने व्याकूळ झालेली आई हिरकणी गडाची खोल कडा उतरुन जाण्याचं धाडस दाखवते”, ही गोष्ट आपण सर्वजण शाळेत शिकलोय. ही गोष्ट ऐकल्यावर आपल्या सर्वांना त्या आईचं खरोखर नवल वाटतं. शाळेत शिकवलेली हिरकणीची गोष्ट आजही तशीच्या तशी मनात खूप खोलवर घर करुन बसली आहे. आता त्या धाडसी हिरकणीची कथा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. यानिमित्त हिरकणीच्या टीमशी साधलेला दिलखुलास संवाद…

प्रसाद ओक आणि त्यांचं २५ जणांचं युनिट यांनी रायगडावर जाऊन गडाची आणि त्या कड्याची पाहणी केली. त्या रात्री नेमके कसे आणि काय घडले असेल याचा अंदाज बांधण्यासाठी २५ जणांचं युनिट हिरकणी बुरुजावर भर पावसात गेलं होतं. साधी गवळण असलेल्या हिरकणीने कसं काय हे धाडस केलं असेल याचा विचार करुन तिने उचललेले धाडसी पाऊल सिनेमाच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे.