‘मसान’पासून ते ‘मिर्झापूर’पर्यंत असंख्य चित्रपट, वेबसीरिजमध्ये झळकलेला अभिनेता म्हणजे पंकज त्रिपाठी. उत्तम अभिनयशैली, संवादकौशल्य यांच्या जोरावर पंकज त्रिपाठी यांचा स्वतंत्र चाहतावर्ग तयार झाला आहे. विशेष म्हणजे त्यांनी कोणतीही साकारलेली भूमिका प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून घेतली. यात खलनायकाच्या भूमिकेचादेखील समावेश आहे. मिर्झापूरमध्ये त्यांनी साकारलेली कालीन भैय्या ही भूमिका अनेकांच्या मनात घर करुन आहे. मात्र पंकज त्रिपाठी निगेटिव्ह भूमिकांची निवड कोणत्या निकषांच्या आधारावर करतात हे त्यांनी अलिकडेच एका मुलाखतीत सांगितलं आहे.

‘मिर्झापूर’मधील कालीन भैय्या, ‘गॅग्स ऑफ वासेपूर’मधील गुलदार सुल्तान, ‘सेक्रेड गेम्स’मधील गुरुजी अशा अनेक निगेटिव्ह भूमिका पंकज त्रिपाठी यांनी साकारल्या असून त्या विशेष लोकप्रिय झाल्या आहेत. मात्र या भूमिकांची त्यांनी निवड कशी केली यामागचं सिक्रेट त्यांनी सांगितलं आहे.

“आम्ही लहान असताना ज्या ज्या खलनायकाच्या भूमिका पाहिल्या त्या सगळ्यांना एक ठराविक मर्यादा होती. तेदेखील सहाजिकच आहे. कारण, साधारणपणे अनेक कथा या एकसारख्याच असायच्या. मात्र सध्याच्या घडीला खलनायक या भूमिकेकडे प्रेक्षक वेगळ्या दृष्टीकोनातून पाहतात. या भूमिका प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय होत आहे. त्यामुळे सध्या टॉप कलाकारांच्या यादीत अनेक खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या कलाकारांचा समावेश आहे. मिर्झापूर असो किंवा गुडगांव यांच्याव्यतिरिक्त सेक्रेड गेम्समध्येदेखील पाहायला गेलं तर एका व्यक्तीच्या डोक्यातील नकारात्मक बाजू( डार्क साईट) दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे अशा भूमिका स्वीकारणं मला आवडतं. म्हणूनच मी कायम विचारशीलतेने भूमिकांची निवड करतो”, असं पंकज त्रिपाठी म्हणाले.

दरम्यान, पंकज त्रिपाठी हे मूळ बिहारचे असून त्यांना कलाविश्वात मोठा स्ट्रगल करावा लागल्याचं सांगण्यात येतं. मात्र पंकज त्रिपाठी हे आज कलाविश्वातील लोकप्रिय आणि प्रसिद्ध नाव आहे. त्यांनी ‘क्रिमिनल जस्टीस’, ‘मिर्झापूर’, ‘मसान’, ‘स्त्री’ अशा अनेक चित्रपट आणि वेबसीरिजमध्ये काम केलं आहे.