परंपरागत प्रतिस्पर्धी असलेले भारत-पाकिस्तानमधील सामने ही क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणीच असते. सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वांमध्येच या सामन्याची उत्कंठा दिसून येते. अनेकदा हे अभिनेते देशात आणि परदेशात सामने पाहण्यासाठी गेल्याचेही याआधी आपण पाहिले आहे. सध्या सोशल मिडियाचा जोरदार प्रभाव असून अनेक अभिनेते भारत आणि पाकिस्तान सामन्याबाबत ट्वीट करत आपल्या भावना व्यक्त करत आहेत.

या सामन्याबाबत प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार म्हणाला, सामन्याच्या दिवशी मी अमेरिकेत सुट्टीचा आनंद लुटत असेन. त्यामुळे सामना पाहणे मी मिस कऱणार नाही. ऋषी कपूर यांनीही ‘उद्या सर्वात मोठी ब्लॉकबस्टर रिलिज होणार आहे.’ असे ट्वीट केले आहे. याबरोबरच अभिषेक बच्चन यानेही ‘कमॉन इंडिया लेटस डू धिस’ असे म्हणत भारतीय क्रिकेटपटूंना चिअर केले आहे.

दुपारी ३ वाजता सुरु झालेल्या या सामन्याचा आनंद क्रिकेटप्रेमींनी घरात बसून घेतला. रविवार असल्याने कुटुंबाबरोबर किंवा मित्रमंडळींबरोबर एकत्रित सामना पाहण्याला अनेकांनी पसंती दिल्याचे चित्र होते. अभिनेतेही अशाचप्रकारे या सामन्याचा आनंद लुटत आहेत.