दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हसन यांच्या ‘इंडियन २’ या चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान क्रेन कोसळल्यामुळे मोठा अपघात झाला. या अपघातामध्ये सेटवरील तीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. या मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची मदत करणार असल्याचे कमल हसन यांनी जाहीर केलं आहे. ‘इंडियन २’ या चित्रपटाचे शूटिंग चेन्नईजवळ ईव्हीपी एस्टेट स्पॉट येथे सुरू होते. बुधवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास सेटवरील क्रेन कोसळून दुर्देवी अपघात झाला. या अपघामध्ये प्रोडक्शन असिस्टंट मधु (२९ वर्ष), सहाय्यक दिग्दर्शक कृष्णा (३४ वर्ष) आणि आर्ट डायरेक्टर चंद्रन (६० वर्ष) यांचा मृत्यू झाला आहे. तर अन्य १० जण जखमी झाले आहे. अपघातातील जखमींना उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघात झाला त्यावेळी कमल हसन सेटवरच उपस्थित होते. कमल हसन यांनी रूग्णालयात जाऊन जखमींची विचापूस केली. त्यानंतर आता हसन यांनी मृत्यांच्या कुटुंबियांना स्वत: एक कोटी रुपयांची मदत करणार असल्याचं जाहीर केलं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना कमल हसन यांनी मदतीची घोषणा केली. "काल घडलेला अपघात दुर्देवी आहे. या अपघातामध्ये आम्ही तीन मित्र गमावले आहेत. या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या प्रत्येकाच्या नातेवाईकांना मी एक कोटी रुपयांची मदत करणार आहे. हे तिघेही गरीब कुटुंबातील असल्याने मी स्वत: ही मदत करणार आहे. यापुढे भविष्यात अशाप्रकारचे अपघात होऊ नये यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे," असं मत हसन यांनी व्यक्त केलं आहे. Kamal Haasan: Yesterday's accident was unfortunate and we lost our 3 friends. I will give financial assistance of Rs 1 crore each to kin of those who lost their lives as they belong to poor families. We must take preventive steps to avoid such accidents in future. — ANI (@ANI) February 20, 2020 ‘इंडियन २’ हा १९९६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘इंडियन’ या चित्रपटाचा सिक्वल असणार आहे. ‘इंडियन’ या चित्रपटात कमल हसन, मनिषा कोइराला आणि उर्मिला मातोंडकर यांच्या मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटाने तीन राष्ट्रीय पुरस्कार पटकावले होते. ‘इंडियन २’ हा कमल हसन यांच्या करिअरमधला अखेरचा चित्रपट ठरणार आहे. कारण या चित्रपटानंतर अभिनय कायमचा सोडणार असल्याचं खुद्द कमल हासन यांनीच स्पष्ट केलं होतं. त्यामुळे या चित्रपटाविषयी प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता आहे. मात्र आता या अपघातामुळे चित्रपटाचे चित्रिकरणावर परिणाम होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.