रहस्यमय कथा आणि चित्रपटांची आवड असलेल्यांसाठी सिद्धार्थ मल्होत्रा, सोनाक्षी सिन्हा आणि अक्षय खन्ना यांचा ‘इत्तेफाक’ चित्रपटगृहात काल प्रदर्शित झाला. ज्यांनी जुना ‘इत्तेफाक’ चित्रपट पाहिला आहे त्यांना नव्या चित्रपटात व्यक्तिरेखांमधले साधर्म्य सोडता दिग्दर्शक अभय चोप्राने फारसे काही स्मरणरंजन करण्यास वाव दिलेला नसल्याने एक पूर्णपणे वेगळी कथा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. समीक्षकांनी ‘इत्तेफाक’ची प्रशंसा केली असली तरी प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी या चित्रपटाला प्रेक्षकांचा फार काही प्रतिसाद मिळाला नसल्याचे दिसते.

वाचा : जाणून घ्या, ‘बाहुबली’चा सेट उभारलेल्या १०० एकर जमिनीचे आता काय झाले?

व्यापार विश्लेषक आणि चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी ‘इत्तेफाक’ला पहिल्या दिवशी थंड प्रतिसाद मिळाल्याचे ट्विट केलेय. तसेच, त्यांनी शनिवार आणि रविवारमध्ये लोक चित्रपटगृहांकडे वळण्याची शक्यता वर्तवत चित्रपटाने ४.०५ कोटी रुपयांची कमाई केल्याचेही लिहिले.

वाचा : Padmavati .. असे झाले राणीसांचे फेअरवेल!

दरम्यान, १९६९ साली यश चोप्रांनी दिग्दर्शित केलेल्या ‘इत्तेफाक’चा हा रिमेक आहे. जुना ‘इत्तेफाक’ ज्यांनी पाहिला आहे त्यांनाही हा चित्रपट आवडेल. कारण कथेचा गाभा कायम ठेवला असला तरी संदर्भ बदलले आहेत. आणि काळानुरूप त्याच व्यक्तिरेखांचे स्वभाव, वृत्तीही बदललेली असल्याने त्याचा एकूण परिणामच बदललेला दिसतो. सिद्धार्थ, अक्षय आणि सोनाक्षी या तिन्ही मुख्य कलाकारांनी दिग्दर्शकाला चांगली साथ दिली असल्याने शेवटपर्यंत चित्रपट प्रेक्षकांना गुंतवून ठेवणारा आहे.