बॉलिवूडमधील हिट चित्रपटांच्या यादीमधील एक चित्रपट म्हणजे ‘जब वी मेट.’ या चित्रपटात बॉलिवूडची बेबो करीना कपूर खान आणि अभिनेता शाहिद कपूर मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाने त्यावेळी बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. करीना आणि शाहिद या जोडीची धमाल केमिस्ट्री असलेल्या या चित्रपटाच्या कथानकापासून ते संगीतापर्यंत सर्वच गोष्टींनी प्रेक्षकांची पसंती मिळवली. नुकतीच या चित्रपटाला १३ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या निमित्ताने आपण चित्रपटाशी संबंधीत काही गोष्टी जाणून घेणार आहोत. सुरुवातीला या चित्रपटासाठी शाहिद कपूर ऐवजी बॉबी देओलची निवड करण्यात आली होती. मात्र करीना कपूरच्या एका अटीमुळे बॉबीला हा चित्रपट गमवावा लागला होता.

‘जब वी मेट’ हा चित्रपट दिग्दर्शक इम्तियाज अलीचा ड्रीम प्रोजेक्ट होता. त्यामुळे या चित्रपटासाठी तो कोणतीही तडजोड करण्यास फारसा तयार नव्हता. त्यामुळेच चित्रपटातील भूमिकेला न्याय देतील असेच कलाकार त्याला हवे होते. यासाठी त्याने बॉबी देओलला पहिली पसंती दिली होती. बॉबीची निवड केल्यानंतर इम्तियाजने चित्रपटाच्या निर्मितीसाठी अष्टविनायक प्रोडक्शनची भेट घेतली. परंतु या चित्रपटामध्ये करीना कपूर मुख्य भूमिकेत असावी अशी अट अष्टविनायक प्रोडक्शनने ठेवली. त्यानुसार, या चित्रपटामध्ये करीनाला घेण्यासाठीचे प्रयत्न सुरु झाले. त्यावेळी करीना आघाडीची अभिनेत्री होती.

या चित्रपटामध्ये करीनाला घेण्यासाठी बॉबी किंवा इम्तियाजलाही कोणतीही समस्या नव्हती. यापूर्वी बॉबीने तिच्यासोबत ‘अजनबी’, ‘दोस्ती – फ्रेंड्स फॉरेव्हर’ यासारख्या चित्रपटांमध्ये काम केले होते. मात्र करीनाने या चित्रपटामध्ये काम करण्यासाठी एक अट ठेवली. तिच्या अटीनुसार, जर या चित्रपटामध्ये तिच्यासोबत अभिनेता शाहिद कपूर मुख्य भूमिकेत झळकणार असेल तरच ती या चित्रपटामध्ये काम करेल. त्यावेळी ती शाहिद कपूरला डेट करत होती. त्यामुळेच तिने ही अट ठेवली होती.

दरम्यान, इम्तियाजचा हा ड्रीम प्रोजेक्ट असल्यामुळे त्याला करीनाची अट मान्य करावी लागली. परिणामी तिच्या मागणीनुसार, या चित्रपटामध्ये बॉबी देओलऐवजी शाहिद कपूरला मुख्य भूमिकेत घ्यावे लागले. परंतु हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला. शाहिद, करिना आणि इम्तियाज अली या तिघांच्याही करिअरमधला हा चित्रपट एक माइलस्टोन ठरला.