‘खंडेराया माझा देव मल्हारी’ अशी साद घालत प्रत्यक्ष खंडेरायाच्या दरबारात जेजुरीत महाशिवरात्रीचा खास खेळ ‘जय मल्हार’च्या टीमने आयोजित केला होता. मात्र पावसामुळे एकदा नव्हे तर दोनदा या कार्यक्रमावर पाणी फिरवल्याने अखेर पुण्यात बंदिस्त सभागृहात खंडोबाचा महाशिवरात्रीचा जागर होणार आहे. जेजुरी गडाच्या पायथ्याशी खास जेजुरीकरांच्या उपस्थितीत ‘झी मराठी’ वाहिनीने ‘येळकोट येळकोट जय मल्हार’ या खास कार्यक्रमाचे आयोजन केले होते. आता पुण्यात रंगलेला हा कार्यक्रम रसिकांना महाशिवरात्रीच्या निमित्ताने पाहायला मिळणार आहे. ‘जय मल्हार’ मालिकेसाठी म्हणून खूप गाणी तयार केली गेली. ही एकमेव मालिका असेल ज्यात एवढी सुंदर गाणी आहेत. या गाण्यांचे कुठेतरी चांगले सादरीकरण व्हावे ही एक इच्छा होती. शिवाय, या मालिकेतील एखादा तरी कार्यक्रम किंवा भाग जेजुरीत करावा, अशी मागणी जेजुरीकरांकडून होत होती. त्यामुळे या दोन्ही गोष्टींची सांगड घालून एक तीन तासांचा कार्यक्रम आम्ही जेजुरीत करणार होतो, असे मालिकेचे निर्माते महेश कोठारे यांनी ‘वृत्तांत’शी बोलताना सांगितले. २८ फेब्रुवारीला हा कार्यक्रम होणार होता, आदल्या दिवशीच आमचा सेट गडाच्या पायथ्याशी तयार होता. मेकअपसाठीच्या खोल्या, व्हॅनिटी व्हॅन, फिरता कॅ मेरा या सगळ्या गोष्टी त्या दिवशी विजेच्या कडकडाटासह पडलेल्या पावसात धुऊन निघाल्या. आमचा सेट पूर्णपणे मोडून पडला होता. ‘झी मराठी’च्या बरोबरीने ‘कोठारे व्हिजन’ या माझ्या निर्मिती संस्थेने पहिल्यांदाच अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते आणि पहिल्याच प्रयत्नात आम्हाला नुकसान सहन करावे लागले. निर्माता म्हणून यातूनही बरेच काही शिकलो, असे कोठारे यांनी सांगितले. हा कार्यक्रम प्रत्यक्ष जेजुरीत करायचा म्हणून आम्ही सगळे कलाकारही उत्सुक होतो. सेटवर सादरीकरणासाठी आम्ही पोहोचलो आणि त्याचवेळी तिथे पाऊस पडला. वाऱ्यामुळे आणि पावसामुळे सेटचे बरेच नुकसान झाले, अशी माहिती मालिकेत म्हाळसेची भूमिका करणाऱ्या अभिनेत्री सुरभी हांडेने दिली. पहिल्या दिवशी नुकसान होऊनही जेजुरीत कार्यक्रम करायचाच या ईर्षेने पुन्हा एका दिवसात सेट उभारला गेला, तयारी पूर्ण झाली. मात्र, त्या दिवशीही पावसाने हजेरी लावल्याने जेजुरीत कार्यक्रम करण्याचे स्वप्न अपूर्णच राहिले, असे कोठारे म्हणाले. ‘येळकोट येळकोट जय मल्हार’ या तीन तासांच्या कार्यक्रमात ‘जय मल्हार’ मालिकेतील आत्तापर्यंतची गाणी, त्यावर आधारित नृत्ये सादर केली जाणार आहेत. याशिवाय, एक नवीन गाणे खास महाशिवरात्रीसाठी तयार करण्यात आले असून ते पहिल्यांदा कार्यक्रमात सादर होणार आहे, असे कोठारे यांनी सांगितले. नृत्यदिग्दर्शक सुभाष नकाशे यांचे तांडवनृत्य हे या कार्यक्रमाचे आकर्षण असून मालिकेप्रमाणेच इथेही आगळेवेगळे ‘नारद आख्यान’ रंगणार असून त्याचे सूत्रसंचालन संकर्षण क ऱ्हाडे यांनी केले आहे.