बकरी ईदला गायींची हत्या करणार असं वक्तव्य करणाऱ्या मौलानाला तात्काळ अटक करा अशी मागणी बॉलिवूड गीतकार जावेद अख्तर यांनी केली आहे. हे वक्तव्य अत्यंत बेजबाबदार आणि संतापजनक असल्याचं जावेद अख्तर यांनी म्हटलं आहे. मौलाना तनवीर पीरा हाशीम यांनी बकरी ईदला गायींची हत्या केली जाईल असं वक्तव्य केलं होतं. धक्कादायक म्हणजे यावेळी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री शिवानंद पाटील उपस्थित होते. उत्तर कर्नाटकात रमझान प्रार्थनेदरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलं होतं.

‘धर्मनिरपेक्षतेचा अर्थ अल्पसंख्यांक सांप्रदायिकता सहन करणं होत नाही. बेजबादार आणि संतापजनक वक्तव्य करणाऱ्या मौलाना तनवीर हाशीम याला बंगळुरुत जातीय तणाव निर्माण केल्याप्रकरणी तात्काळ अटक करण्यात आली पाहिजे’, असं जावेद अख्तर यांनी म्हटलं आहे. ट्विटरच्या माध्यमातून जावेद अख्तर यांनी हे वक्तव्य केलं आहे.

तनवीर हाशीम यांच्या गायींची हत्या करण्याच्या वक्तव्यानंतर कर्नाटकात वाद निर्माण झाला होता. तनवीर हाशीम विजयपुरा येथील हाशीम पीर दर्ग्याचे प्रमुख आहेत. त्यांचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मात्र ज्यांच्या उपस्थितीत हे वक्तव्य करण्यात आलं ते मंत्री शिवानंद पाटील यांनी मात्र यावर मौन बाळगलं आहे.