मुंबई : तिरस्कारातून उलगडणाऱ्या प्रेमाची कथा सांगणारी ‘जीव माझा गुंतला’ ही मालिका २१ जूनपासून दररोज रात्री ९.३०वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नावीन्यपूर्ण आशयातून प्रेमाचे विविध पैलू उलगडण्याचे काम कायमच कलर्स मराठी वाहिनीने केले आहे. अशीच एक आगळीवेगळी कथा घेऊन मल्हार आणि अंतराचे नाते घराघरांत पोहोचणार आहे. घरातील एकटी कमावती अंतरा रिक्षा चालवून घर सांभाळते. तर, दुसरीकडे मल्हार आईचा लाडका, श्रीमंत व्यावसायिक. यशाचा ताठा असल्यामुळे तो भावनेत अडकणारा नाही. पण त्याच्या आयुष्यात असा प्रसंग येतो की त्याला मनाविरुद्ध अंतराशी लग्न करावे लागते. मनात पराकोटीचा तिरस्कार असतानाही केलेल हे लग्न सफल होईल का, आणि झालेच तर त्यांच्या प्रेमाचा प्रवास कसा असेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. कथेची निर्मिती ‘टेल-अ-टेल’ मिडियाने केली आहे. ‘कोणतीही कथा त्यातल्या पात्रांमुळे स्मरणीय ठरत असते. कथेपेक्षा त्या कथेतील पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करतात. ‘जीव माझा गुंतला’ ही अशीच दोन वैशिष्टय़पूर्ण, महत्त्वाकांक्षी पात्रांची गोष्ट आहे,’ असे मालिकेचे लेखक जिंतेंद्र गुप्ता यांनी सांगितले. करोना काळात नात्यांची विविध रूपे आपल्यासमोर आली. अशा वेळी नात्यांच्या पैलूंवर विचार करून त्यातील अनोखी बाजू मनोरंजनातून प्रेक्षकांसमोर मांडण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. ‘जीव माझा गुंतला’ मालिका ग्रामीण महाराष्ट्राच्या पार्श्वभूमीवर आधारित असून योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले यांची नवी जोडी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. - दीपक राजाध्यक्ष, मराठी टेलिव्हिजन प्रमुख - वायकॉम १८