दोन समांतर रेषा कधीही जुळू शकत नाहीत, त्याचप्रमाणे एकमेकांचा तिरस्कार करणारी, भिन्न स्वभावाची दोन माणसं कधीही एकत्र येऊ शकत नाहीत. पण प्रेम अशक्य गोष्ट शक्य करू शकतं असं म्हणतात.या वाक्याचा प्रत्यय जीव झाला येडापिसा या मालिकेत पाहायला मिळाला. दोन भिन्न विचारांचे- स्वभावाचे शिव आणि सिद्धी एकत्र आले. सुरुवातीला एकमेकांशी सतत भांडणाऱ्या या दोघांमध्ये प्रेमाचा अंकुर फुलला आहे. त्यामुळे या मालिकेत रंगत आली आहे. अशातच घरात लवकरच सनई-चौघडे वाजणार आहेत. सोनी आणि सरकारच्या लग्नाचा विचार सध्या घरात सुरु आहे. मात्र या लग्नाला शिवाचा पूर्णपणे विरोध असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता शिवा हे लग्न होऊ देतो की नाही हे पाहणं महत्त्वाचं आहे.

खरंतर सोनीचा या लग्नाला विरोध आहे. तिला मुळीच हे लग्न करायचं नाही. परंतु आत्याबाईंपुढे घरात कोणाचं चालत नसल्यामुळे तिला नाइलाजाने या लग्नाला तयार व्हावं लागतंय. परंतु शिवा सोनीच्या पाठिशी खंबीरपणे उभा आहे. मात्र मंगल आणि आत्याबाई मिळून नवीन कारस्थान रचणार आहेत.

दरम्यान, मालिकेमध्ये पुढे काय होणार ? मंगल आणि आत्याबाई मिळून कुठलं नव कारस्थान करणार ? सिद्धी शिवाच्या साथीने त्याला कशी सामोरी जाणार हे बघणे रंजक असणार आहे.