लॉकडाउनच्या अटी शिथील केल्यानंतर काही दिवसांपूर्वीच ‘राजा रानीची गं जोडी’ या मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली. त्यानंतर आता ‘जीव झाला येडापिसा’ या मालिकेच्या चित्रीकरणालाही सुरुवात झाली असून लवकरच ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘जीव झाला येडापिसा’ ही मालिका सुरु झाल्यापासून पहिल्याच दिवसापासून प्रेक्षकांनी शिवा आणि सिद्धीवर भरभरुन प्रेम केलं आहे. त्यामुळे लॉकडाउनच्या काळात सगळेच या जोडीला मिस करत होते. मात्र आता या मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे लवकरच मालिकेचे नवे भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

‘जीव झाला येडापिसा’ मालिकेचं चित्रीकरण सुरु करण्यापूर्वी चित्रपटाच्या सेटवर प्रत्येक व्यक्तीची विशेष काळजी घेण्यात आलं. चित्रीकरणाचा परिसर, मेकअप रूम्स, सेट या सगळ्या ठिकाणी सॅनिटाइजेशन करण्यात आलं. त्यानंतर खऱ्या अर्थाने मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली.

दरम्यान, येत्या २१ जुलैपासून या मालिकेचा नवा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जीव झाला येडापिसा मालिकेमध्ये सिध्दी आणि शिवाचं प्रेम दिवसागणिक फुलू लागले. या दोघांमधले प्रेमळ क्षण पाहण्याची आतुरता प्रेक्षकांना होती आणि ते आता मालिकेमध्ये बघायला मिळाणार आहे. त्यातच आत्याबाईंनी सोनी आणि सरकारच्या लग्नाचा प्रस्ताव पुन्हा एकदा लष्करे कुटुंबासमोर मांडला. त्यामुळे शिवा नाराज आहे. परंतु, सिद्धीमुळेच शिवाने या लग्नाला नकार दिला असून सिद्धीच या सगळ्याला कारणीभूत असल्याचं मंगल आणि आत्याबाईंना वाटतं. त्यामुळे आता सासू – सुनेच्या या भांडणात शिवा सिध्दीला कसे सांभाळून घेईल, सिद्धी – शिवाच्या नात्यात आलेला गोडवा आत्याबाईंमुळे हिरावून तर जाणार नाही ना ? मंगलमुळे या दोघांमध्ये दुरावा येईल ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक आतूर आहेत.