रोखठोक मत मांडण्यासाठी अभिनेत्री कंगना रणौत ओळखली जाते. माध्यमांनी विचारलेल्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर ती न अडखळता देते. असा एकही प्रश्न नाही ज्याचे उत्तर कंगनाकडे नाही. कंगना आणि हृतिक रोशनमधील वाद सर्वज्ञात आहे. या वादावर पडदा पडला असल्याचे वाटत असतानाच कंगनाने पुन्हा या वादाला तोंड फोडलंय. रजत शर्माच्या ‘आप की अदालत’ या कार्यक्रमामध्ये मुलाखतीसाठी गेलेल्या बॉलिवूडच्या या ‘क्वीन’ने हृतिकने माझी माफी मागावी, असे म्हटले.

वाचा : काय? २४ वेळा रणवीरच्या कानशिलात लगावली!

हृतिक रोशनला मी कोणतीही कायदेशीर नोटीस पाठवली नसल्याचे सांगत कंगनाने, ‘मी खूप अपमान सहन केलाय. मी अनेक रात्री रडून घालवल्या आहेत. तणावामुळे मी रात्री झोपायचेही नाही,’ असे म्हटले. ऑनलाइन लीक झालेल्या मेलवरही तिने यावेळी भाष्य केले. ‘ते सर्व वाईट मेल माझ्या नावावर प्रसिद्ध करण्यात आले. अजूनही लोक ते सर्च करून वाचतात. या कृत्याकरता त्याने माझी माफी मागितली पाहिजे. पीआरमार्फत त्यांनी माझ्याविषयी अनेक अफवा पसरवल्या आहेत.’

वाचा : काळवीट शिकार प्रकरणी चौकशीदरम्यानचा सलमानचा हा व्हिडिओ पाहिला का?

जेव्हा कधी संधी मिळेल किंवा याविषयी प्रश्न विचारण्यात येतील तेव्हा मी नक्की बोलेन, असेही कंगनाने म्हटलेय. नुकतेच तिच्या आगामी ‘सिमरन’ चित्रपटातील गाणे प्रदर्शित करण्यात आले. यावेळी, तू पुन्हा जुन्या गोष्टींवर का बोलत आहेस, तू हे सगळं प्रसिद्धीसाठी करतेस अशी चर्चा आहे. यामागे काही विशेष कारण आहे का, असा सवाल तिला करण्यात आला. त्यावर कंगनाने सडेतोड उत्तर देत म्हटले की, मला अशाप्रकारे नक्कीच प्रसिद्धीची गरज नाही. निर्मात्यांनी सांगितल्यामुळे मी व्हिडिओ इंटरव्ह्यूसाठी उपस्थित राहिले. मला जर असे प्रश्न विचारण्यात आले तर मी नक्कीच उत्तर देणार. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर दिले नसते तर तुम्ही म्हणाला असता की, कंगनाने आमच्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही. आता बोलतेय तर तेही तुम्हाला पटत नाहीये. अशा परिस्थित मी काय करायला हवे, ते तुम्हीच सांगा.
यावेळी कंगनाने तिच्या लग्नावरही भाष्य केले. ‘मला लग्न करण्याची इच्छा आहे. पण, सध्या मला करिअरवर लक्ष केंद्रित करायचे आहे. त्यानंतरच मी लग्नाचा विचार करू शकेन,’ असे कंगना म्हणाली.