बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. ती नेहमीच बॉलिवूडमधील सेलिब्रिटींवर टीका करत असते. मात्र यावेळी ती कुठल्याही टीकेमुळे नव्हे तर तिच्या घराबाहेर झालेल्या चक्क गोळीबारामुळे चर्चेत आहे. कंगनाच्या मनाली येथील राहत्या घरी काही अज्ञात लोकांनी गोळीबार केला असा दावा तिने केला आहे. पोलीस सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

कंगनाने टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत या घटनेबाबत माहिती दिली. ती म्हणाली, “मी रात्री माझ्या खोलीत झोपले होते. त्यावेळी ११.३०च्या दरम्यान मला फटाक्यांसारखा आवाज आला. पहिल्यांदा मी आवाजाकडे दुर्लक्ष केलं, पण तसाच आवाज पुन्हा एकदा आला. मात्र यावेळी तो आवाज फटाक्यांसारखा नव्हता तर बंदुकीतून सुटलेल्या गोळीसारखा होता. त्यानंतर मी वॉचमनला बोलावलं त्याने देखील आवाज ऐकला पण तो आवाज नेमका कसला होता हे त्याला सांगता आलं नाही. मग मी शेवटी पोलिसांकडे तक्रार केली. मी सध्या राजकिय, सामाजिक आणि बॉलिवूडमधील घराणेशाहीवर भाष्य करत आहे. त्यामुळे माझं मत न पटणाऱ्यांनी मला घाबरवण्यासाठी हा गोळीबार केला असावा असं मला वाटतं. पोलीस सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहेत.”

यापूर्वी कंगना अभिनेत्री आलिया भट्टमुळे चर्चेत होती. आलियाच्या वाढदिवसाचं निमित्त साधून तिने बॉलिवूडमधील स्टार किड्सवर निशाणा साधला होता. तिने आपल्या टीमच्या ट्विटर हँडलवरुन आलियाला शुभेच्छा देणाऱ्या कलाकारांबाबत संताप व्यक्त केला होता. “हा आहे खरा खेळ. यांच्यापैकी एकाही स्टारकिड्सने सुशांतसाठी न्याय मागितला नाही. अन् आता त्या मूर्ख मुलीच्या फोटोसाठी पूर्ण इंडस्ट्री एकवटली आहे. व्वा रे व्वा” अशा आशयाचं ट्विट करुन कंगनाने आपला संताप व्यक्त केला होता.