अयोध्या येथील विवादित राम मंदिराच्या प्रकरणावर अलिकडेच सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. या प्रकरणात घडलेल्या संपूर्ण घटनाक्रमावर अभिनेत्री कंगना रनौत आता एक चित्रपट तयार करणार आहे. तिने ‘मणिकर्णिका’ या चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पदापर्ण केले होते. आता ती राम मंदिरावरील चित्रपटातून निर्मिती क्षेत्रात देखील पदार्पण करत आहे.

कंगनाच्या या आगामी चित्रपटाचे नाव ‘अपराजित अयोध्या’ असे आहे. प्रसिद्ध लेखक के. व्ही. विजेंद्र प्रसाद सध्या या चित्रपटाच्या पटकथेवर काम करत आहेत. याआधी त्यांनी ‘बाहुबली’ या चित्रपटाची पटकथा तयार केली होती. या चित्रपटात एका नास्तिक तरुणाचा आस्तिकतेपर्यंतचा प्रवास दाखवला जाणार आहे. पुढच्या वर्षी या चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात होईल. अशी माहिती स्पॉटबॉय या वेबसाईटने दिली आहे.

“अयोध्येतील राम मंदिर उभारणीच्या प्रदीर्घ काळ चिघळलेल्या मुद्दय़ावर अखेर सर्वोच्च न्यायालयाने निकालाद्वारे सामंजस्यपूर्ण तोडगा काढला आहे. या निकालामुळे अखेर हा मुद्दा समाप्त झाला. लहानपणापासून मी या प्रकरणाबाबत ऐकत आले आहे. म्हणूनच मी या कथानकावर चित्रपट तयार करण्याचा निर्णय घेतला,” असे कंगना रनौत म्हणाली.