जवळपास एक वर्षाच्या ब्रेकनंतर कॉमेडीचा बादशहा कपिल शर्मा पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘द कपिल शर्मा शो’चे दुसरे पर्व नुकतेच सुरू झाले. या शोच्या निमित्ताने कपिलसोबतच किकू शारदा, चंदन प्रभाकर, सुमोना चक्रवर्ती आणि रोशेल राव हेसुद्धा छोट्या पडद्यावर परत आले. कपिलच्या या जुन्या टीमसोबतच कृष्णा अभिषेक आणि भारती सिंग या दोन नव्या कलाकारांचाही त्यात समावेश झाला. नव्या वर्षात कपिलच्या शोची दणक्यात सुरुवात झाली असली तरी पुनरागमनासाठी त्याला मानधनाच्या कपातीची किंमत मोजावी लागली आहे. कपिलने या शोसाठी त्याच्या मानधनात लाखो रुपयांची कपात केल्याचं समजतंय.

‘द कपिल शर्मा शो’च्या वीकेंड एपिसोडसाठी जिथे आधी तो ६० ते ७० लाख रुपये मानधन घेत होता. त्याठिकाणी आता कपिल वीकेंड एपिसोडसाठी फक्त १५ ते २० लाख रुपये इतकेच मानधन घेत आहे. विशेष म्हणजे या शोमध्ये नव्याने आलेले कृष्णा अभिषेक आणि भारती सिंग सुमारे १० ते १२ लाख रुपयांचं मानधन घेत आहेत.

‘द कपिल शर्मा शो’च्या पहिल्या पर्वातील सहकलाकार सुनील ग्रोवर याच्याशी झालेल्या वादानंतर कपिलचा पडता काळ सुरू झाला. बऱ्याच प्रयत्नानंतर त्याचा हा नवीन शो सुरू झाला. त्यामुळे कदाचित कपिलने त्याच्या मानधनात कपात केली असावी अशी चर्चा आहे. या शोमुळे कपिलची कामगिरी उत्तम झाल्यास त्याचे मानधन भविष्यात वाढूही शकते आणि त्याचे भविष्य हे प्रेक्षकांच्या प्रतिसादावर अवलंबून आहे. दुसरीकडे कपिलला ‘कानपूरवाले खुरानास’ या शोची टक्कर आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा कपिल शर्मा प्रेक्षकांना खळखळून हसवण्यात यशस्वी ठरणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.