अनुराग कश्यपच्या वक्तव्यामुळे करिना कपूर बऱ्याच कालावधीनंतर चर्चेत आली आहे. बॉलीवूड कलावंतांची गरमागरम चर्चा आणि त्यांची गुपितं फोडणारा करण जोहरचा ‘कॉफी विथ करण’ हा कार्यक्रम लोकप्रिय न झालाच तर नवल. अनुराग कश्यप हा अनुष्का शर्मासोबत करणबरोबर ‘कॉफी प्यायला’ गेला होता. त्यात झटपट प्रश्नफैरीमध्ये तो चटकन बोलून गेला की, बेबोने यापुढे कोणताही चित्रपट स्वीकारताना त्यात कलावंत कोण आहे ते पाहण्याऐवजी त्याआधी चित्रपट कशावर आहे, त्यात कोणती भूमिका साकारायची आहे, त्याचे वैशिष्टय़ काय आहे हे विचारून मगच चित्रपट स्वीकारावा. आता अनुरागने दिलेला हा अनाहूत सल्ला ऐकल्यावर खरे तर बेबो भडकणार असे अपेक्षित होते. पण झाले भलतेच. करिना कपूरने ‘हो, अनुरागचे बरोबरच आहे. मी आतापर्यंत मनाचा कौल मिळाला तरच चित्रपट स्वीकारत होते. पण यापुढे मी अनुरागने दिलेल्या मित्रत्वाच्या सल्ल्याप्रमाणेच वागायचे ठरविलेय. मला नीट ओळखणाऱ्या अनुरागसारख्या दिग्दर्शकाकडून हा चांगला सल्ला मला मिळालाय. त्याच्या सल्ल्याबरोबरच मला एक नवीन मित्र न शोधताच भेटलाय,’ असे सांगत करिनाने सगळ्यांनाच धक्का दिला.
अनुरागच्या रूपाने करिनाला चांगला मित्र हवाय की अप्रत्यक्षपणे अनुरागने करिनाला आपल्या आगामी चित्रपटात काम करण्याविषयी विचारणा केलीय हे मात्र लवकरच समजेल.