ज्ञानाच्या जोरावर पैसे जिंकण्याची संधी देणारा ‘कौन बनेगा करोडपती’ हा रिअॅलिटी शो प्रेक्षकांमध्ये चांगलाच लोकप्रिय आहे. या शोचा बारावा सिझन नुकताच चालू झाला आहे. मात्र यंदाच्या सिझनमध्ये पहिल्यांदाच कधी न पाहायला मिळालेली घटना प्रेक्षकांना पाहायला मिळाली. शो सुरू असतानाच अचानक बिग बींचा कम्प्युटर बंद पडला आणि पुढे काय करावं हेच त्यांना सुचत नव्हतं.

बिहारमधील पाटणा येथील राज लक्ष्मी यांनी १२ लाख ५० हजार रुपये जिंकल्यानंतर शो सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर महाराष्ट्रातील स्वप्निल चव्हाण हॉटसीटवर बसले. बिग बींनी त्यांचं स्वागत केलं आणि पहिला प्रश्न विचारला. एक हजार रुपयांच्या प्रश्नानंतर शोमध्ये दोन हजार रुपयांचा दुसरा प्रश्न विचारण्याआधी कम्प्युटर अचानक बंद पडला. “और दो हजार रुपयों के लिए ये रहा आप का सवाल”, असं बिग बी दोन-तीन वेळा म्हणाले पण कम्प्युटरवर प्रश्न झळकलाच नाही. नेमकं काय झालं हे न समजल्याने बिग बी म्हणाले ‘कम्प्युटर तो अटक गया’. त्यानंतर त्यांनी त्यांच्या डावीकडे मदतीसाठी पाहिलं आणि तेवढ्यात कम्प्युटर सुरू झाला.

आणखी वाचा : मुकेश अंबानींच्या स्टाफच्या पगाराचा आकडा ऐकून थक्क व्हाल, नोकराची मुलं अमेरिकेत घेतात शिक्षण

‘केबीसी’मध्ये पहिल्यांदाच असं घडल्याचं म्हटलं जात आहे. केबीसीची संपूर्ण टीम शो सुरुळीत चालू राहण्यासाठी अथक प्रयत्न करत असते. मात्र यावेळी पहिल्यांदाच अवघ्या दहा सेकंदांसाठी बिग बींचा कम्प्युटर बंद पडला.