बॉलिवूडमध्ये गेल्या काही दिवसांत देशभक्तीपर चित्रपटांचा जणू ट्रेण्डच आला होता. असाच एक चित्रपट दिग्दर्शक अनुराग सिंह यांनी प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. पण या चित्रपटाची कथा फारशा लोकांना माहीत नाही किंवा इतिहासातील या शौर्यगाथेची बॉलिवूडने तितकी दखल घेतली नाही असं म्हणावं लागेल. अक्षय कुमारची मुख्य भूमिका असलेल्या 'केसरी' या चित्रपटात सारागढी युद्धातील २१ रणवीरांची शौर्यगाथा सांगण्यात आली आहे. २१ शीख सैनिक विरुद्ध तब्ब्ल १० हजार अफगाणी सैन्य असं हे युद्ध होतं. शीख सैन्याने शौर्याचा अभूतपूर्व नमुना या युद्धात दाखवून दिला होता. सारागढी हे गाव आजच्या पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा भागात आहे. या भागाजवळून अफगाणिस्तानचा मुलुख सुरू होतो. या भागातून वेळोवेळी अफगाणी हल्लेखोर ब्रिटिशांवर हल्ले करायचे. या हल्ल्यांना थोपवण्यासाठी ब्रिटिशांनी आपली ३६वी शीख बटालियन या भागात तैनात केली. सैन्याची ठाणी किल्ल्यांवर होती. अफगाणी सैन्याचं मुख्य लक्ष हे किल्ला हस्तगत करण्यावर होतं. १२ सप्टेंबर १८९७ रोजी झालेली लढाई अशाच एका हल्ल्याच्या विरुद्धची लढाई होती. पण हा हल्ला त्यावेळचा सर्वात मोठा हल्ला होता. कारण १० हजार अफगाणी सैन्य सारागढीवर चालून गेले होते. सारागढी चौकीची जबाबदारी ही इशर सिंग यांच्यावर होती. चित्रपटात अक्षय कुमारे इशर सिंग यांची भूमिका साकारली आहे. १२ सप्टेंबर रोजी हल्ला झाल्यानंतर ब्रिटिशांनी त्यांना माघार घ्यायला सांगितलं होतं, पण या पठ्ठ्याने प्राण जाईपर्यंत लढण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाला त्यांच्या तुकडीतील इतरांनी साथ दिली. २१ जणांनी १० हजार अफगाणी सैन्याच्या विरुद्ध दिलेला हा अभूतपूर्व लढा ठरला. दिग्दर्शक अनुराग यांनी उत्तम काम केलं असून चित्रपटाचा स्क्रीनप्ले, सिनेमॅटोग्राफी कौतुकास्पद आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा चित्रपट तुम्हाला कथेशी जोडून ठेवते. चित्रपटातील दृश्यांची भव्यता मंत्रमुग्ध करणारी आहे. अक्षय कुमारने इशर सिंग यांच्या भूमिकेला न्याय दिला आहे. परिणीतीची भूमिका थोड्या वेळासाठीच आहे. पण त्यातही तिने आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. चित्रपटातील इतर कलाकारांनीही उत्तम अभिनय केलं आहे. या चित्रपटाला साडेतीन स्टार.