गेल्या वर्षभरापासून बॉलिवूडमध्ये लग्नसराईचे वारे वाहत असून अनेक अभिनेते, अभिनेत्री विवाहबंधनात अडकले आहेत. त्यामुळे ‘इश्कजादे’ चित्रपटातून चंदेरी दुनियेमध्ये पदार्पण करणारा अभिनेता अर्जुन कपूर कधी लग्न करणार याकडे त्याच्या चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. त्यामुळेच अर्जुनने नुकतंच लग्न कधी करणार असल्याचं सांगितलं.

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनानंतर अर्जुन घर आणि करिअर या दोन्ही जबाबदाऱ्या उत्तमरित्या पार पाडत असल्याचं पाहायला मिळत आहे. या दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या अर्जुनने त्याचा मोर्चा आगामी चित्रपटांकडे वळविला आहे. मात्र असं असल तरी त्याच्या लग्नाच्या चर्चा काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीत. त्यामुळे अर्जुनने आता यावर उत्तर दिलं आहे.

‘माझी बहीण रिया आणि अंशुला यांचं लग्न झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही. त्यांच लग्न करणं ही माझी जबाबदारी आहे. त्यांच लग्न झाल्यावरच मी लग्न करेन. त्यामुळे माझ्या लग्नाला किती वर्ष लागतील मला माहित नाही. कदाचित ४ किंवा ६ वर्षही लागू शकतात’, असं अर्जुनने सांगितलं.

दरम्यान, अर्जुनने दिलेल्या या उत्तरामुळे त्याच्या चाहत्यांचा नक्कीच हिरमोड झाला असणार. मात्र एक जबाबदार भाऊ म्हणून अर्जुन त्याच्या जबाबदाऱ्या नीट पार पाडत असल्याचं यावरुन दिसत आहे. अर्जुन लवकरच ‘नमस्ते इंग्लंड’ या चित्रपटात झळकणार असून हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादामध्ये सापडल्याचं दिसून येत आहे.