बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र या धक्कादायक प्रकरणावरुन अभिनेता कमाल आर. खान याने बॉलिवूड कलाकारांवर निशाणा साधला आहे. बॉलिवूडमधील कुठलाच कलाकार गरज असताना कोणाच्या मदतीला धावून जात नाही, अशी चकित करणारी प्रतिक्रिया त्याने दिली आहे.

काय म्हणाला कमाल खान?

“सुशांतने आत्महत्या करण्यापूर्वी एकदा मदतीसाठी हाक मारायला हवी होती. आम्ही धावत जावून त्याची मदत केली असती, असं काही बॉलिवूड कलाकार आता म्हणत आहेत. परंतु हे साफ खोटं आहे. या व्यवसायात कोणीही कोणाच्याही मदतीला धावून जात नाही. प्रत्येकाला स्वत:च्या समस्या स्वत:च सोडवाव्या लागतात.” अशा आशयाचं ट्विट करुन कमाल खानने सुशांतला श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अवश्य पाहा – सुशांतचं पोस्टमॉर्टम आधी करण्यात आली करोना चाचणी, कारण…

सुशांतचा थक्क करणारा प्रवास

सुशांतने नैराश्यामुळे आत्महत्या केली असं म्हटलं जात आहे. मात्र अद्याप त्याबद्दल अधिकृत माहिती मिळाली नाही. ‘शुद्ध देसी रोमान्स’, ‘डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी’, ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’, ‘केदारनाथ’, ‘छिछोरे’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने दमदार भूमिका साकारल्या आहेत. २००९ मध्ये ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून तो घरघरांत पोहोचला. त्याच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक झालं.