छोट्या पडद्यावर लोकप्रिय ठरलेली मालिका म्हणजे 'लागीरं झालं जी'. या मालिकेच्या माध्यमातून आज्या आणि शीतली ही जोडी घराघरात पोहोचली. ही जोडी केवळ प्रेक्षकांच्या घरातच पोहोचली नाही, तर त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्यदेखील केलं. त्यामुळे ही मालिका संपल्यानंतर अनेकांचा हिरमोड झाला होता. त्यातच आता शीतल पुन्हा कधी प्रेक्षकांच्या भेटीला येणार याची उत्सुकताही प्रेक्षकांमध्ये दिसू लागली. त्यातच आता शितलीच्या अर्थात शिवानी बावकरच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. शिवानी लवकरच एका मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'लागीरं झालं जी'नंतर आता शिवानी लवकरच परच येणार आहे. झी मराठीवरील आगामी 'आलटी पालटी' या मालिकेमध्ये शिवानी झळकणार असून या मालिकेत ती मुख्य भूमिका साकारणार आहे. विशेष म्हणजे या मालिकेत ती ठग म्हणून प्रेक्षकांना दिसणार आहे. "मला अभिनयाची आवड आहे, त्यामुळे मला तो करायचा आहे. मग त्याचं माध्यम कोणतेही असो टीव्ही किंवा इतर कुठलंही. शितलच्या भूमिकेने मला काम करण्याची संधी आणि समाधान दिलं. इतकंच नाही, तर प्रसिद्धीही दिली. मात्र आता मी साकारत असलेली भूमिका शितलच्या पूर्णपणे विरुद्ध आहे", असं शिवानीने सांगितलं. दरम्यान, लागीरं झालं जी या मालिकेतील शितलची भूमिका प्रचंड गाजली होती. बेधडक आणि बिंधास्तपणा, अस्खलित सातारी बोली या साऱ्यामुळे शितलने प्रेक्षकांच्या नजरा खिळवून ठेवल्या होत्या. त्यामुळे आता आगामी मालिकेमध्ये शिवानीची भूमिका कशी असेल आणि ती प्रेक्षकांच्या पसंतीत उतरणार की नाही हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.