बॉलीवूडमधील बहुचर्चित जोडपे मलाइका आणि अरबाज यांच्यातील दुरावा अद्यापही कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबईतील एका कार्यक्रमातून अरबाजमुळे मलाइकाला काढता पाय घ्यावा लागला. या कार्यक्रमात अरबाजने हजेरी लावली नव्हती. मात्र अरबाज विषयी प्रसारमाध्यमांनी सवाल केल्यामुळे मलाइकाने चक्क कार्यक्रमावर पाणी फेरले. अरबाज खान आणि मलाइका सध्या एकमेकांपासून वेगळे राहत आहेत. दोघे वेगळे झाल्यापासून या ना त्या कारणाने प्रसारमाध्यमे त्यांच्या नात्याला उजाळा देण्याचा प्रयत्न करतात. मुंबईतील कार्यक्रमामध्ये पाहुणी म्हणून सहभागी झाल्यानंतर मलाइकाला प्रसारमाध्यमांनी दोघांच्या नात्याविषयी छेडले. मलाइकाला एका पत्रकाराने अरबाज खान विषयी विचारणा केल्यामुळे तिचा राग अनावर झाला. अरबाजचे नाव घेतल्यामुळे ती पत्रकारावर चक्क भडकली.
या कार्यक्रमात पत्रकाराने मलाईकाला सोशल मिडियावर सक्रिय असण्याबाबत सवाल केला. यावेळी त्याने अरबाजही सक्रिय असल्याचे म्हटल्याने मलाइकाला पत्रकाराचा राग आला. प्रत्येक जण आज सोशल मिडियावर सक्रिय असल्याचे सांगत मलाइकाने अरबाजविषयी प्रतिक्रिया देण्यास अनुत्सुकता दाखवली. अरबाजचे नाव घेतल्यामुळे ती चक्क कार्यक्रमातून निघून गेली. अरबाज आणि मलाइका यांचे सतरा वर्षांचे वैवाहिक नाते घटस्फोटापर्यंत पोहोचल्याच्या चर्चांनाही मध्यंतरी उधाण आले होते. मात्र काही दिवसांपूर्वी अरबाजच्या वाढदिवसाला मलाइकाच्या उपस्थितीमुळे पुन्हा दोघे एकत्र येणार असल्याची चर्चा बॉलीवूड वर्तुळात रंगली होती. मलाइका आणि अरबाज यांच्या नात्यात नव्याने कोणते वळण येणार याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले होते.