सध्या छोट्या पडद्यावर अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या कालानुरुप मालिकांच्या कथानकांमध्येदेखील अमुलाग्र बदल होताना दिसत आहे. त्यामुळेच चित्रपटांप्रमाणेच मालिकांमध्येही नवनवीन विषय हाताळण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं पाहायला मिळतं. यामध्येच आता ‘काय घडलं त्या रात्री?’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विशेष म्हणजे या मालिकेच्या माध्यमातून लोकप्रिय अभिनेत्री मानसी साळवी तब्बल १३ वर्षांनंतर छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहे.
झी मराठी वाहिनीवर येत्या ३१ डिसेंबरपासून ‘काय घडलं त्या रात्री?’ ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेच्या माध्यमातून मानसी दमदार पदार्पण करणार आहे. त्यामुळे बऱ्याच काळानंतर मानसीला पुन्हा एकाद मालिकेमध्ये पाहण्यासाठी प्रेक्षक आतूर झाले आहेत. मानसीने आतापर्यंत अनेक गाजलेल्या हिंदी व मालिकांमध्ये काम केलं आहे.

‘काय घडलं त्या रात्री?’ या मालिकेत मानसी एका प्रामाणिक महिला आय.पी.एस. ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहेत. एका प्रतिष्ठित व्यक्तीच्या हत्येमागील कोडं सोडवण्यासाठी तिची नेमणूक केली जाते. कोणत्याही प्रसंगाला ही ऑफिसल निडरपणे सामोरी जाते. तसंच राजकारण वा कुणासमोरही न झुकता वर्दीशी एकनिष्ठ राहून तपास करते, अशी एकंदरीत मानसीची भूमिका आहे.

“प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं कि त्याला एक अशी दमदार भूमिका साकारायला मिळावी जी त्याला आपलीशी वाटेल. ‘काय घडलं त्या रात्री?’ या मालिकेत आय.पी.एस. ऑफिसर रेवती बोरकरची भूमिका साकारताना मला खूप आनंद आणि अभिमान वाटतोय. ती एक कणखर अधिकारी आणि एक प्रेमळ आई अशा दुहेरी भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. कायदा, आदेश आणि न्याय यांचं पालन आणि आदर करत पोलीस खातं, नागरिक, राज्य आणि आपला देश यांच्याप्रती आपल काम चोख बजावण्यासाठी ती प्रयत्नशील आहे. ती एक तत्वनिष्ठ आयपीएस ऑफिसर जी बदलत्या परिस्थितीत देखील आपल्या तत्वांशी एकनिष्ठ असते. 13 वर्ष उलटली असली तरी देखील आजही प्रेक्षकांना माझी कारकिर्द लक्षात आहे आणि माझ्या आगामी भूमिकेला देखील तितकाच आपुलकीने प्रोत्साहन देत आहेत यासाठी मी प्रेक्षकांची ऋणी आहे,” असं मानसी म्हणाली.

दरम्यान, मानसीने यापूर्वी ‘सौदामिनी’ आणि ‘नुपूर’ , ‘असंभव’ या सुप्रसिद्ध मालिकांमध्ये काम केलं आहे. ‘असंभव’ या मालिकेतील तिची शुभ्रा ही भूमिका प्रचंड गाजली होती.