सुभाष घई यांच्या 'सौदागर' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश करणाऱ्या मनिषाकडे आजही हरहुनरी अभिनेत्री म्हणून पाहिलं जातं. मनिषाने आजवर अनेक आशयघन चित्रपटांमध्ये काम केलं असून स्वत: सिद्ध केलं आहे. मात्र बॉलिवूडमध्ये यशस्वी अभिनेत्री म्हणून वावरणाऱ्या या अभिनेत्रीला या चंदेरी दुनियेमध्ये कधी प्रवेश करायचाच नव्हता असं समोर आलं आहे. बॉलिवूडमध्ये स्वत:चा ठसा उमटविणाऱ्या मनिषाने आतापर्यंत नेपाळी, तेलुगू आणि तामिळ यासारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मनिषाने केवळ अभिनयावरच आपलं लक्ष केंद्रित केलं नाही तर त्याला भरतनाट्यम आणि मणिपुरी या नृत्यप्रकाराचीही जोड दिली. या दोन्ही नृत्यांमध्ये पारंगत असलेल्या मनिषाला कधीही कलाक्षेत्रात यायचं नव्हतं. तिला वैद्यकीय क्षेत्रात जाण्याची प्रचंड इच्छा होती. नेपाळमधील काठमांडू येथील प्रकाश कोईराला यांच्या घरी जन्मलेल्या मनिषाने वसंत कन्या महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं होतं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मनिषाला एका सर्वसामान्य मुलीप्रमाणे डॉक्टर होण्याची इच्छा होती. दरम्यान, मॉडेलिंग क्षेत्रामुळे चंदेरी दुनियेत प्रवेश करणाऱ्या मनिषाने बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले. नुकताच प्रदर्शित झालेल्या 'संजू' या चित्रपटामध्ये मनिषाने संजय दत्तची आई नर्गिस यांची भूमिका वठविली होती. या चित्रपटाव्यतिरिक्त मनिषाने 'मुंबई एक्स्प्रेस', '१९४२ : अ लव स्टोरी', 'इन्सानियत के देवत', 'एल्गार', 'सौदागर', 'मिलन', 'दुश्मनी', 'अनोखा अंदाज' , 'यूंही कभी', 'लाल बादशाह' , 'कच्चे धागे', 'कारतूस', 'जय हिन्द', 'लावारिस', 'मन' यासारखे चित्रपट केले आहेत.