प्रसिद्ध लेखक, अभिनेता राजन पाटील यांनी अलिकडेच एक भावनिक पोस्ट शेअर केली होती. आजारपणाला कंटाळल्यामुळे मी शस्त्र टाकली आहेत, असं ते या पोस्टमध्ये म्हणाले होते. त्यांच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर एकाच चर्चेचा उधाण आलं होतं. अनेकांनी त्यांनी सावरण्याचा आणि खंबीर राहण्याचा सल्ला दिला होता. विशेष म्हणजे चाहते आणि दिग्गज कलाकारांच्या कमेंट पाहिल्यानंतर राजन पाटील यांनी पुन्हा उभारी धरली आहे. मी पुन्हा हत्यार उपसले आहे. आता फक्त एल्गार !, असं म्हणत त्यांनी नवीन पोस्ट शेअर केली आहे. "नमस्कार मंडळी, माणसाच्या आयुष्यात कधी कधी असा एखादा क्षण येतो की तो माणूस राहत नाही. माणसाचा ऑथेल्लो किंवा हॅम्लेट का होतो याला तर्कशुद्ध उत्तर नाही. तो तसा होतो याला कारण त्याच्या आयुष्यातला ' तो ' क्षण. माझ्या आयुष्यात तो क्षण आला. सर्वकाही असह्य झालं. पराभव समोर उभा राहिला. आणि त्या क्षणाने घात केला.fb वर पोस्ट सोडली. कच खाल्ली. पण तुम्ही सगळे त्यावर इतक्या त्वेषानं व्यक्त झालात की माझ्यावरच्या त्या क्षणाची पकड क्षणात सुटली. सावध झालो. लज्जित झालो. खाडकन मुस्काटात बसल्यानंतर जाग यावी तसा भानावर आलो. स्वतःला खडसावले, ' साल्या, लोक तुला बघून, तुला आदर्श मानून आयुष्यात लढा सोडत नाहीत. हरणारी लढाई सुद्द्धा लढतात आणि प्रसंगी जिंकतात ही. आणि तू ? तुला लढायला हवं. तुझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना तू फसवणार ? लाज वाटत नाही? नेता बनायची हौस आहे ना, मग नेत्यासारखे वाग. आता माघार नाही. शेंडी तुटो वा पारंबी, पण लढाई सोडायची नाही ' मंडळी, तुम्ही जो आवाज माझ्या कानाखाली काढलात त्याचे पडसाद आता माझ्या मृत्युबरोबरच्या लढाईत उमटणार हे निश्चित. मी पुन्हा हत्यार उपसले आहे. आता फक्त एल्गार ! हर हर महादेव !.राजन पाटील", अशी नवीन पोस्ट राजन पाटील यांनी केली आहे. दरम्यान, राजन पाटील हे मराठी कलाविश्वातील नावाजलेलं नाव आहे. अभिनयासोबतच ते उत्तम लेखकदेखील आहेत. रंग माझा, माझ माणसं ही पुस्तक त्यांनी लिहिली आहेत. सोबतच 'रायगडाला जेव्हा जाग येते', 'तोची एक समर्थ', 'तरुण तुर्क म्हातारे अर्क', 'मित्र', 'शर्यत', 'बरड', 'मुंबई आमचीच', अशा अनेक नाटक, चित्रपट व मालिकांत त्यांनी काम केले आहे.