कमी कालावधीत लोकप्रिय झालेली मालिका म्हणजे कारभारी लयभारी. सध्या या मालिकेत राजवीर आणि प्रियांकाच्या लग्नाची लगबग सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. कुटुंबाचा विरोध पत्करुन प्रियांका राजवीरशी लग्न करण्यासाठी तयार झाली आहे. त्यामुळे सध्या या दोघांच्या लग्नापूर्वीच्या मंगलकार्याला सुरुवात झाली आहे. परंतु, अंकुशराव पाटील यांना हे लग्न मान्य नसल्यामुळे ते या मंगलकार्यात विघ्न आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचं पाहायला मिळत आहे. प्रियांका आणि राजवीरच्या लग्नाची खबर अंकुशरावापर्यंत पोहोचू नये यासाठी राजवीरच्या मित्रांनी योग्य ती खबरदारी घेतली आहे. लग्नमंडपाच्या चहुबाजूने मुलांनी कडक पहारा ठेवला आहे. परंतु, या लग्नाची खबर अंकुशरावापर्यंत पोहोचावी यासाठी काकी तशी व्यवस्था करते आणि ऐन लग्नात अंकुशराव मंडपात पोहोचून या लग्नाला विरोध करतो. इतकंच नाही तर प्रियांकाला हात धरुन घरी घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. दरम्यान, या सगळ्या प्रकार पोलीसही घटनास्थळावर पोहोचतात आणि प्रियांकादेखील राजवीरची बाजू घेत वडिलांसोबत घरी जाण्यास नकार देते. या संपूर्ण प्रकारानंतर नेमकं काय होतं? अंकुशराव पाटील प्रियांकाला खरंच घरी नेतात का? राजवीर प्रियांकाचं लग्न होतं का? या सगळ्या प्रश्नांची उत्तर मालिका पाहिल्यानंतरच प्रेक्षकांना मिळणार आहेत.