सध्या छोट्या पडद्यावर मालिकांच्या माध्यमातून वेगवेगळे विषय हाताळले जात आहेत. यामध्येच 'राजा रानीची गं जोडी' ही मालिका प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. त्यामुळे कमी कालावधीमध्ये ही मालिका लोकप्रिय झाल्याचं दिसून येत आहे. त्यातच या मालिकेत रणजीत आणि संजीवनी यांचं नातं छान फुलू लागलं आहे. त्यामुळे या मालिकेत रंगत दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु आता या दोघांच्या नात्यात एका लहान गोष्टीमुळे खटके उडू लागले आहेत. त्यातचं संजीवनीच्या आयुष्यातील एक गोष्ट रणजीत समोर येणार आहे. ज्यामुळे तो तिच्यावर प्रचंड चिडल्याचं दिसून येत आहे. एकीकडे रणजीतसोबतचा संसार फुलवत असताना संजीवनी कुसुमावतींचं मन जिंकण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र कुसुमावती प्रत्येक गोष्टींमध्ये संजीवनीचा पाणउतारा करण्याचा प्रयत्न करत असतात. वेळोवेळी तिच्या चुका दाखवून देत आहेत. ढाले पाटील यांच्या सुनांनी चालीरिती, नियम यांचा मान ठेऊन राहणे गरजेचे आहे याची जाणीव देखील करून देत आहेत. आता मात्र त्यातील काही गोष्टी रणजीतला खटकू लागल्या आहेत. परंतु संजीवनीच्या सांगण्यावरून तो शांत आहे. ढाले पाटील यांच्या घरात संजीवनी आणि बेबी मावशी यांची चांगलीच गट्टी जमली आहे. त्यासोबतच आता संजीवनीची सुजीत भाऊजींसोबतही चांगली मैत्री होऊ लागली आहे. याच काळात संजीवनी आणि रणजीत यांच्यात खटके उडू लागल्याचं दिसून येत आहे. संजीवनीची एक गोष्ट रणजीतला मुळीच पटत नाहीये. ही नेमकी गोष्ट काय हे अद्याप तरी गुलदस्त्यात आहे. राजश्रीने नुकतीच कुसुमावतीच्या सांगण्यावरुन संजीवनीची जन्म पत्रिका मागवून घेतली आहे. या पत्रिकेमधून अनेक गोष्टींचा उलगडा होणार आहे. त्यातच संजीवनी वयाने लहान असल्याचं घरात कोणालाच ठावूक नाहीये. पंजाबराव यांच्या सांगण्यावरुनच संजीवनीने ही गोष्ट घरातल्यांपासून लपवून ठेवली आहे. त्यामुळे ढाले पाटलांच्या घरात बरीच उलाढाल होणार आहे. मात्र या सगळ्यात रणजीत संजीवनीवर नेमकं कोणत्या कारणामुळे चिडलाय हे मालिका पाहिल्यावरच त्याचा उलगडा होणार आहे.