विद्येविना मती गेली, मतिविना नीती गेली, नीतिविना गती गेली, गतिविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले या शब्दात महात्मा ज्योतीराव फुले यांनी शिक्षणाचे महत्व सांगितले आहे. शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार यासाठी पत्नी सावित्रीबाई फुले यांसोबत त्यांनी आपले अखंड आयुष्य वेचले. शिक्षणाची क्रांतीज्योत पेटवणाऱ्या फुले दाम्पत्यांची ही यशोगाथा ‘सावित्री जोती’ या मालिकेतून उलगडली जात आहे. सध्या या मालिकेमध्ये जोतीराव आणि सावित्रीबाई यांचं बालपण दाखवत असून नुकताच त्यांचा  विवाह सोहळा संपन्न झाला.

या मालिकेमध्ये समर्थ पाटील हा जोतीरावांची भूमिका वठवत आहे. तर तृष्निका शिंदे ही सावित्रीबाईंची व्यक्तिरेखा साकरत आहेत. सावित्री जोती या मालिकेद्वारे फुले दाम्पत्यांचे सहजीवन आणि जातीपातींच्या पलिकडे जाऊन समाजासाठी त्यांनी केलेले नि:स्वार्थी काम दाखवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. इ.स. १८४० साली जोतीराव फुले आणि सावित्रीबाई यांचा विवाह झाला. लग्नाच्या वेळी सावित्रीबाई वय नऊ वर्षांच्या, तर जोतीरावांचे वय तेरा वर्षांचे होते.

तत्कालीन संस्कृती आणि रूढी परंपरांच्या कचाट्यात सापडलेल्या त्याकाळच्या अशिक्षित वर्गाची दशा आणि दुर्दशा या मालिकेद्वारे प्रेक्षकांना जवळून अनुभवता येत आहे. स्त्री शिक्षणाची पाळेमुळे रोवणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या मूळ व्यक्तिरेखेत अश्विनी कासार ही अभिनेत्री आपल्याला पाहायला मिळणार असून, ओंकार गोवर्धन जोतीराव फुलेंच्या भूमिकेत दिसणार आहे.

वाचा : ‘मलंग’मध्ये अमृता खानविलकरनंतर झळकणार ‘हा’ मराठमोळा अभिनेता

‘तो काळ प्रेक्षकांसमोर जिवंतपणे उभा करणे आव्हान आहे. त्यामुळे विविध तंत्रांच्या साहाय्याने त्या काळातील जीवन, घर, तत्कालीन सामाजिक परिस्थिती अशा अनेक घटकांशी साधर्म्य साधण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करत आहे. यानिमित्ताने सावित्री आणि जोतिबांचे कार्य घराघरात पोहचवले जाईल,’ असे मालिकेचे निर्माते नितीन वैद्य यांनी सांगितले.