सध्या झी मराठी वाहिनीवरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अक्षरश: राज्य करत आहे. या मालिकेतील शनाया, गुरुनाथ आणि राधिका हे पात्र घराघरांमध्ये पोहोचले आहे. त्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. टीआरपीच्या यादीमध्ये देखील ही मालिका टॉप तीन मालिकांमध्ये आहे.

सध्या ही मालिका एका वेगळ्या वळाणावर येऊन पोहोचली आहे. राधिकाने गुरुनाथला घराबाहेर काढले आहे. त्यामुळे गुरुनाथ हमाली करुन त्याचे पोट भरताना दिसत आहे. तर दुसरीकडे शनायाची आई सुलक्षणाबाई पैशांसाठी शनायाचे लग्न गुरूनाथ ऐवजी अमाप पैसा असणाऱ्या पोपटरावसह लावणार असते. शनायाची आई लग्नाच्या बदल्यात पोपटरावकडे १० कोटींची मागणी करते. शनू बेबीसाठी वेडा असणारा पोपटराव १० कोटींची व्यवस्था करतो आणि त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी दोन माणसेदेखील नेमतो. परंतु शनायाला पोपरावसह लग्न करायचे नसल्यामुळे तिला चिंत्ता वाटू लागते.

दरम्यान शनायाचे लग्न पोपटरावसह न लावता १० कोटी रुपये कसे पसार करायचे यासाठी सुलक्षणाबाई शनायाला गुरुनाथची मदत घेण्याचा सल्ला देतात. शनाया गुरुनाथचा शोध घेते आणि त्याला मदतीची विनंती करते. गुरुनाथ एका पायावर शनायाला मदत करण्यास तयार होतो आणि भर मांडवातून शनायाला चालाखीने पळवून आणतो. दरम्यान सुलक्षणाबाई पोपटरावने दिलेले १० कोटी घेऊन तेथून फरार होता. आता पोपटराव शनायाचा शोध घेणार का? की पोपटराव शनायाचा बदला घेणार? शनाया आणि गुरु आता पुन्हा एकत्र राहणार का? असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले आहेत.